विक्रम, राज्यात एकाच दिवसात कोरोनाचे १४०८ रुग्ण बरे होऊन घरी

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना एक चांगली बातमी हाती आली आहे.  

Updated: May 22, 2020, 06:24 AM IST
विक्रम, राज्यात एकाच दिवसात कोरोनाचे १४०८ रुग्ण बरे होऊन घरी title=

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना एक चांगली बातमी हाती आली आहे. एकाच दिसात कोरोनाचे १४०८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात  आतापर्यंत राज्यभरात ११ हजार ७२६ रुग्ण बरे झाले आहेत.  तर आतापर्यंत कोरोना बाधितांची एकूण संख्या ४१ हजार ६४२ झाली आहे. गुरुवारी २३४५ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात सध्या २८ हजार ४५४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३ लाख १९ हजार ७१० नमुन्यांपैकी २ लाख ७८ हजार ६८ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ४१ हजार ६४२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ४ लाख ३७ हजार ३०४ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून २६ हजार ८६५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात काल ६४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून एकूण संख्या १४५४ झाली आहे. गुरुवारी झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये ४१, मालेगाव ९, पुण्यात ७, औरंगाबाद  शहरात ३, नवी मुंबईमध्ये २, पिंपरी- चिंचवड -१ तर सोलापुरात १  मृत्यू झाला आहे. काल नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ३६  पुरुष तर २८ महिला आहेत. आज झालेल्या ६४ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३१  रुग्ण आहेत तर २९  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे.  कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १४५४ झाली आहे.

दरम्यान, राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १९४९ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून काल एकूण १५ हजार ८९४ सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी ६४.८९  लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.