मुंबईतून सिनेसृष्टी अन्यत्र हलवू देणार नाही - रामदास आठवले

मुंबई मनोरंजन विश्वाची राजधानी आहे.  

Updated: Oct 17, 2020, 08:17 PM IST
मुंबईतून सिनेसृष्टी अन्यत्र हलवू देणार नाही - रामदास आठवले title=

मुंबई : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे तशीच मनोरंजन विश्वाचीही राजधानी आहे. मुंबईत मराठी आणि हिंदी चित्रपट निर्माण होतात. सिनेविश्वात मुंबईच्या बॉलिवूडची  वेगळी ओळख  निर्माण झाली आहे. त्यामुळे मुंबईतून सिनेसृष्टी अन्यत्र हलवू देणार नाही. तसा कोणी प्रयत्न केला तर रिपब्लिकन पक्ष तीव्र विरोध करेल, असा ईशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे.

आज मुंबईत अभिनेत्री पायल घोष हिने केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांची विलेपार्ले येथे भेट घेतली त्यानंतर प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना रामदास आठवले यांनी मुंबईची चित्रपटसृष्टी अन्यत्र हलवू देणार नसल्याचा ईशारा दिला आहे.

मुंबईत फिल्म इंडस्ट्री राहिली पाहिजे. मुंबईच्या बॉलिवूडचा चेहरा आता ड्रग्जच्या आरोपांनी थोडा बदनाम झाला आहे. मात्र सर्व बॉलिवूड वाईट नाही. बॉलिवूड मधील तारका  पायल घोष हिने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर अत्याचाराचा आरोप केला आहे. त्याबाबत चौकशी  सुरू आहे.

बॉलिवूड मध्ये असा  वाईट अनुभव आलेल्या महिलांनी हिम्मत बाळगून त्यांच्या  स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी तसेच त्यांना न्याय देण्यासाठी रिपब्लिकन पक्ष  साथ देईल असे आवाहन रामदास आठवले यांनी केले.