महापालिका, जिल्हा परिषदेत महाविकासआघाडीचा फॉर्म्युला राबवण्यासाठी तयारी

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न

Updated: Feb 22, 2021, 02:21 PM IST
महापालिका, जिल्हा परिषदेत महाविकासआघाडीचा फॉर्म्युला राबवण्यासाठी तयारी  title=

दीपक भातुसे, मुंबई : राज्यातील सत्तेचा महाविकास आघाडीचा फॉर्म्युला आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत राबवण्याच्या दृष्टीने महाविकास आघाडीतील पक्षांनी कंबर कसली आहे. शक्य असेल त्या महापालिका आणि जिल्हा परिषदेत एकत्र येऊन महाविकास आघाडीतील तीन किंवा दोन पक्ष आघाडी करून भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यादृष्टीने काँग्रेसने बैठकही बोलवली आहे. येत्या वर्षभरात राज्यात 15 मोठ्या महापालिका आणि 27 जिल्हा परिषदा आणि 100 च्या घरात नगर परिषदांच्या निवडणुका होणार आहेत.

विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे भिन्न विचारांचे तीन पक्ष एकत्र आले. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा एकमेव अजेंडा डोळ्यासमोर ठेवून ही महाविकास आघाडी स्थापन झाली. जर हे तीन पक्ष एकत्र आले तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवता येऊ शकतं याची प्रचिती नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीतही आली. त्यामुळेच भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विशेषतः मोठ्या महापालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवणार आहेत. 

ज्या महापालिकेत किंवा जिल्हा परिषदेत सध्या जो पक्ष क्रमांक एकवर असेल त्याच्या नेतृत्वाखाली ती महापालिका किंवा जिल्हा परिषद निवडणूक लढवली जाणार आहे. जसं महाविकास आघाडीतील पक्षांपैकी पुण्यात राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे, त्यामुळे तिथे राष्ट्रवादीला महत्त्व दिलं जाणार आहे.

राज्यात 2014 साली भाजप सत्तेत आल्यानंतर झालेल्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने निर्विवाद यश मिळवलं. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीचं पूर्ण पानीपत झालं होतं. येत्या वर्षभरात होणाऱ्या 15 महापालिकांपैकी पाच महापालिकांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत.

नवी मुंबईत भाजपची सत्ता आहे. कोल्हापूरात महाविकासआघाडीची सत्ता आहे. वसई-विरार बहुजन विकास आघाडीची सत्ता आहे. कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेची, तर औरंगाबादमध्ये शिवसेना-भाजप युतीची सत्ता होती. उरलेल्या 10 महापालिकांची निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणार असून 10 पैकी तब्बल 8 महापालिका भाजपकडे आहेत. यात पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, नाशिक, अकोला, अमरावती, सोलापूर, उल्हासनगर यांचा समावेश आहे. तर शिवसेनेकडे मुंबई आणि ठाणे या दोन महापालिका आहेत.

महापालिका आणि जिल्हा परिषदेतील भाजपचं हे वर्चस्व मोडण्यासाठीच एकत्र निवडणूक लढवण्याची व्यूहरचना आखली जात आहे. 

राज्यातील सत्तेप्रमाणे भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एकत्र येणार असले तरी काही ठिकाणी आघाडी होण्याची शक्यता अवघड आहे. जसं कोल्हापूर महापालिकेत महाविकास आघाडीतील तीनही पक्ष वेगळे लढणार असल्याचं स्पष्ट आहे. इतरही काही ठिकाणी महाविकास आघाडी होणार नाही, मात्र जिथे भाजपं वरचढ आहे, तिथे आघाडी करूनच निवडणूक लढवली जाणार आहे.

2014 साली सत्तेवर आल्यानंतर भाजपने जास्तीत जास्त महापालिका आणि जिल्हा परिषदा आपल्या ताब्यात ठेवल्या होत्या. मात्र आता राज्यातील सत्तेत राबवलेला महाविकास आघाडीचा प्रयोग महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीतही व्यवस्थित राबवला तर भाजपसाठी ती डोकेदुखी ठरणार आहे.