भारत न्याय यात्रेत प्रकाश आंबेडकर सहभागी होणार, पण... काँग्रेससमोर ठेवली ही अट

Bharat Jodo Nyay Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत न्याय यात्रेचं निमंत्रण प्रकाश आंबेडकर यांनी स्विकारलं आहे. पण त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेससमोर अट ठेवली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधी यांना पत्र पाठवलं आहे. 

देवेंद्र कोल्हटकर | Updated: Jan 17, 2024, 03:22 PM IST
भारत न्याय यात्रेत प्रकाश आंबेडकर सहभागी होणार, पण... काँग्रेससमोर ठेवली ही अट title=

Bharat Jodo Nyay Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी  (Rahul Gandhi) यांनी मणिपूर ते मुंबईपर्यंत 6700 किलोमीटरची भारत जोडो न्याय यात्रा सुरु केली आहे. 66 दिवसांच्या ही यात्रा 15 राज्य, 100 लोकसभा आणि 337 विधानसभा मतदारसंघातून मार्गक्रमण करेल. याआधी राहुल गांधी यांनी सप्टेंबर 2022 ते जानेवारी 2023 पर्यंत कन्याकुमार ते काश्मिर अशी भारत जोडो यात्रा काढली होती. या यात्रेत अनेक नेते सहभागी झाले होते. यावेळी देखील इंडिया आघाडीतले (INDIA Alliance) नेते यात्रेत सहभागी होण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनाही निमंत्रण देण्यात आलं असून प्रकाश आंबेडकर यांनी हे निमंत्रण स्विकारलं आहे. 

प्रकाश आंबेडकर भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होणार आहेत, पण यासाठी त्यांनी काँग्रेससमोर एक अट ठेवली आहे, प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधी यांना यासंदर्भात एक पत्र पाठवलं आहे.

प्रकाश आंबेडकर यांचं पत्र
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही VBA ला अद्याप INDIA आघाडी अथवा मविआ मध्ये समाविष्ट करून घेतलेले नाही. यात विडंबन म्हणजे आपण पाठवलेल्या निमंत्रणात "आपण INDIA आघाडीचे महत्त्वाचे घटक आहात" असं म्हटले आहे.  सध्याच्या धर्मांध, जातीय, विभाजनकारी वातावरणात मोदींच्या सरकारविरोधात असणाऱ्यांनी सर्वसमावेशक भूमिका घेणे अत्यंत आवश्यक आहे, जे की संघटित शक्ती व कार्यक्रम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भाजप आरएसएसच्या दुष्ट करावयांविरोधात लढ्याला टिकवून ठेवण्यासाठी गरजेचं आहे. 

VBA अविरतपणे भाजप आरएसएसशी लढत आहे. VBA हा पक्ष केवळ 6 वर्षांचा असला तरी माझा आणि माझ्या सहकाऱ्यांचा वैचारिक लढा हा काही नवीन नाही. हा लढा म्हणजे मनुस्मृतीने संहिताबद्ध आणि टिकवून ठेवलेल्या हिंदू जाती व्यवस्थेविरुद्ध एक बंड आहे. हा लढा आम्हाला महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि माझे आजोबा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून मिळालेला वारसा आहे, किंवा त्याहीपेक्षा त्यांनी दिलेली सर्वात महत्त्वाची शिकवण आहे. या सर्वांचा विश्वास होता की धर्म हा माणसाच्या वैयक्तिक आयुष्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावतो आणि त्यांनी विविध धार्मिक विचारांचा पुरस्कार केला. आज आम्ही मुस्लिम, ओबीसी, गरीब मराठा आणि अर्थातच दलीत, आदिवासी व इतर भेदभावग्रस्त, उपेक्षित लोकांसाठी लढतो व त्यांचा आम्हाला पाठिंबा आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत दिलेल्या शेवटच्या भाषणातला काही भाग आपण इथे लक्षात घेतला पाहिजे. बाबासाहेबांनी या नवीन गणराज्यासमोर येऊ शकणारी आव्हाने नमूद केली होती, आणि दुर्दैवाने ती भीती खरी होताना दिसत आहे. 

".. जर राजकीय पक्षांनी देशापेक्षा जातीला जास्त महत्त्व दिलं, तर देशाचं स्वातंत्र्य पुन्हा धोक्यात येईल, आणि कदाचित ते आपण कायमचं गमावून बसू. या परिणामापासून आपण सर्वांनी दृढनिश्चय करून बचाव केला पाहिजे. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आपले स्वातंत्र्य वाचवण्याची आपली तयारी असली पाहिजे." 

"आपली ही राजकीय लोकशाही आपल्याला सामाजिक लोकशाही सुद्धा करावी लागेल. सामाजिक लोकशाहीचा पाया असल्याशिवाय राजकीय लोकशाही टिकू शकत नाही. सामाजिक लोकशाही म्हणजे काय? तर अशी जीवन पद्धत जी स्वातंत्र्य, समता व बंधुता यांना जीवनाची तत्व म्हणून स्वीकार करेल. ही तत्व त्रिरत्नतील वेगवेगळी सूत्र मानली जाऊ नये." 

बाबासाहेबांचा संदेश, जो वारसा आम्हाला शिकवण म्हणून मिळाला आहे, तो अगदी सोपा आहे - सामाजिक लोकशाही, जी स्वातंत्र्य, समता, बंधुतेला मान्य करेल. माझे आणि माझ्या सहकाऱ्यांचेही तुम्हाला हेच सांगणे आहे. जात, धर्म, पंथाला देशापेक्षा वर ठेवणाऱ्या भाजप आरएसएस शी आपल्याला लढायचे असेल, तर काँग्रेसने  सामाजिक लोकशाहीचा अजेंडा पुढे करावा. केवळ शब्दांनीच नव्हे कृती कार्यक्रमातूनही. सवर्ण केंद्रित राजकारण सामाजिक लोकशाहीला हानिकारक आहे. 

आपल्या भारत जोडो न्याय यात्रेचे निमंत्रण मी सशर्त स्वीकारत आहे. दीर्घ प्रतिक्षित INDIA आघाडी व मवीआ मध्ये समाविष्ट होण्याचे निमंत्रित येत नाही तोपर्यंत या यात्रेत सहभागी होणे माझ्यासाठी अवघड आहे. हे निमंत्रण नसताना तुमच्या यात्रेत सहभागी झाल्यास युती झाल्याचे अंदाज बांधले जाऊ लागतील, जी अजून झालेलीच नाही, आणि या सर्वाचे नकारात्मक परिणाम होतील. तथापि आपण VBA ला INDIA आघाडी तसेच मवीआ मध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण द्यावे असा आमचा आग्रह आहे.