मुख्यमंत्र्यांना अटक करा; 'त्या' वक्तव्याच्या आधारे ठाकरे गटाकडून यंत्रणांना आव्हान

Political News : राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी सुरु असतानाच कल्याणमध्ये घडलेल्या एका घटनेनं अनेकांच्याच नजरा वळवल्या. 

सायली पाटील | Updated: Feb 5, 2024, 08:19 AM IST
मुख्यमंत्र्यांना अटक करा; 'त्या' वक्तव्याच्या आधारे ठाकरे गटाकडून यंत्रणांना आव्हान   title=
political news ganpat gaikwad eknath shinde latest update

Ganpat Gaikwad Mahesh Gaikwad Kalyan Firing : कल्याण पूर्व येथील भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यामध्ये गोळीबार झाल्याच्या घटनेनं फक्त कल्याणच नव्हे, तर संपूर्ण राजकीय वर्तुळाला हादरा बसला. पोलीस स्थानकातच हा सर्व प्रकार घडला आणि संपूर्ण राजकीय वर्तुळातून घडल्या प्रकारावर प्रतिक्रिया देण्यात आली. इथं महाराष्ट्रात पोलीस स्थानकंच सुरक्षित नसतील तर, मग इतर गोष्टींच्या सुरक्षेची अपेक्षा करावी तरी कशी? असाच प्रश्न शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या सामना या मुखपत्रातून उपस्थित करण्यात आला आहे. 

उत्तर प्रदेशात घडणाऱ्या अनेक गुन्ह्यांचा उल्लेख करत पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या हत्या घडवण्यासारख्या घटना आता महाराष्ट्रात घ़डत असल्याच्या वास्तवाचा सामानातून ठाकरे गटाच्या वतीनं निषेध करत या साऱ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दोषी म्हणण्यात आलं आहे. 

खुद्द मुख्यमंत्र्यांनी कल्याण गोळीबार घटनेमधील शिंदे गटांच्या जखमींना पाहण्यासाठी रुग्णालयात जाऊन त्यांची चौकशी करणं, या साऱ्यावर पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रतिक्रिया न येणं गंभीर असल्याचं म्हणत राज्यात केंद्रातील मातब्बरांकडून नेमलेल्या मुख्यमंत्र्यांच्या नावे रक्तपात आणि गुंडगिरी सुरु असल्याचं मोठं वक्तव्य ठाकरे गटाकडून करण्यात आलं आहे. 

'ते' वक्तव्य नजरा वळवणारं... 

आमच्यासारख्या चांगल्या माणसांना एकनाथ शिंदेंनी गुन्हेगार केलं, असं म्हणत गायकवाड यांचा जबाब यंत्रणांनी गांभीर्यानं घ्यावा असा सूरही ठाकरे गटाकडून आळवण्यात आला असून, महाराष्ट्रात गुन्हेरागांरांचं राज्य गुन्हेगारांसाठी चालवलं जात असून, त्यासाठी दिल्लीचाही आशीर्वाद असल्याचं म्हणत सताधाऱ्यांवर निशाणा साधण्यात आला. 

हेसुद्धा वाचा : Weather Updates : उत्तरेकडील राज्यांवर बर्फाची चादर; महाबळेश्वर, माथेरानसह मुंबईतील हवामानार कोणते परिणाम? 

तपास करा... यंत्रणांना आव्हान! 

कल्याणमधील गोळीबार प्रकरणाची उत्तस्तरीय चौकशी होणार असल्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं असलं तरीही हा दिखावा असून, मुख्यमंत्रीच हे गुंडांचं राज्य चालवत असल्याची जळजळीत टीका ठाकरे गटाकडून करण्यात आली. या प्रकरणात गणपत गायकवाड यांनी दिलेला जबाब आणि त्यांचं 'एकनाथ शिंदे यांच्याकडे माझे कोट्यवधी रुपये पडले आहेत' हे वक्तव्यच मनी लॉण्ड्रिंग प्रकरणाकडे खुणावत असल्यामुळं त्याच दिशेनं तपास व्हावा अशी मागणी करत मुख्यमंत्र्यांना पीएमएलए कायद्याअंतर्गत अटक व्हावी अशी मागणी ठाकरे गटानं उचलून धरत तीव्र शब्दांत निषेध नोंदवला.