Sanjay Raut : जेल की बेल? संजय राऊत यांचा गुरुवारी निकाल

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना जेल मिळणार की बेल, याचा गुरुवारी (4 ऑगस्ट)  फैसला होणार आहे.

प्रशांत अंकुशराव | Updated: Aug 3, 2022, 09:20 PM IST
Sanjay Raut : जेल की बेल? संजय राऊत यांचा गुरुवारी निकाल title=

प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना जेल मिळणार की बेल, याचा गुरुवारी (4 ऑगस्ट)  फैसला होणार आहे. राऊतांचा ईडी (Enforcement Directorate) कोठडीत फैसला pmla कोर्टात होणार आहे. पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणात अटकेत असलेले संजय राऊत यांची ईडी कोठडी 4 ऑगस्ट रोजी संपत आहे. ईडीने राऊतांना 31 जुलैला रात्री उशिरा भांडुपच्या घरातून ताब्यात घेऊन अटक केली होती. (patra chawl scam case hearing of shiv sena mp sanjay raut case in pmla court on thursday 4th august)

ईडीने यानंतर राऊतांना न्यायालयात हजर करून आठ दिवसाची कोठडी मागितली. मात्र न्यायालयाने 4 ऑगस्टपर्यंतच ईडी कोठडी दिली. आता ईडी गुरुवारी पुन्हा एकदा कोठडी वाढवून मिळावी, यासाठी मागणी करणार आहे. 

पत्राचाळ प्रकरणात प्रवीण राऊत आणि संजय राऊत यांचे आर्थिक संबंध असल्याचं ईडीने कोर्टात सांगितलं होतं. दर महिन्याला दोन लाख रुपये अशाप्रकारे एक कोटीं पेक्षा जास्त रक्कम राऊतांना मिळाली होती.  त्याचप्रमाणे या गुन्हेगारीच्या पैशातून राऊतांनी दादर येथील फ्लॅट आणि अलिबाग कीहिममध्ये जागा खरेदी, असा आरोप ईडीने ठेवला आहे. 

कीहीम येथे जागा खरेदी करताना राऊत यांनी 3 कोटी रुपयाचा व्यवहार रोख पद्धतीने केला. तो व्यवहार कसा केला यासाठी ईडी कोठडी मागू शकते. तर प्रवीण राऊत आणि संजय राऊत यांच्याबाबतीत व्यवहाराची चौकशी करण्याकरता ईडीकडून अधिक कोठडीची मागणी केली जाऊ शकते.

अशोक मुदगीर मांडणार बाजू

राऊत यांची गुरुवारी पी एम एल ए कोर्टात खटल्याचा सुनावणी होणार आहे. अशोक मुदगीर हे राऊत यांची बाजू मांडणार आहेत. कोर्टात नेण्याआधी राऊत यांची वैद्यकीय चाचणी केली जाईल. जर राऊतांना ईडी कोठडी मिळाली, तर त्यांना पुन्हा ईडीच्या कार्यालयात आणण्यात येईल. तर न्यायालयीन कोठडी मिळाली तर मात्र आर्थर रोड किंवा तळोजा तुरुंगात त्यांची रवानगी होऊ शकते. 

न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर संजय राऊत जामिनासाठी अर्ज करू शकतात. मात्र त्यावर तातडीने सुनावणी होणं कठीण आहे. उद्या  संजय राऊत यांच्यासाठीचा महत्त्वाचा दिवस आहे. त्यामुळे आता काय निर्णय होतो, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय.