मुंबईसह 'या' ठिकाणच्या शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

पावसाने पुन्हा जोर पक़डला आहे. 

Updated: Sep 19, 2019, 07:25 AM IST
मुंबईसह 'या' ठिकाणच्या शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई: गेल्या कित्येक दिवसांपासूबन सुरु असणाऱ्य़ा पावसाने पुन्हा एकदा मुंबई, ठाण्यासह अनेक उपनगरांमध्ये तसंच कोकण आणि रायगड पट्ट्यात जोर पक़डला आहे. बुधवारी रात्रीपासूनच पावसाने मुंबई आणि उपनगरात जोर धरल्यामुळे सावधगिरीचा इशारा म्हणून गुरुवारी मुंबई आणि पावसामुळे प्रभावित परिसरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनीच ट्विट करत ही घोषणा केली. मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. ज्याअंतर्गत मुंबई, ठाणे, कोकण पट्ट्यातील शाळा आणि महाविद्यालयं बंद राहणार आहेत. अतिवृष्टीमुळे सखल भागांत साचणारं पाहणी, वाहतुकीवर होणारे परिणाम आणि त्यामुळे विस्कळीत होणारं जनजीवन या सर्वच गोष्टी नजरेत घेत हा निर्णय़ घेतला गेला आहे. 

हवामान विभागाकडूनही पुढील काही तासांत मुसळधार पावसाची शक्यता  वर्तवण्यात आली आहे.  परिणामी नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जुलै महिन्याच्या मध्यापासून सुरु झालेल्या पावसाने सप्टेंबर महिन्याचही विश्रांती घेतलेली नाही. गणेशोत्सवादरम्यानही वरुणराजा बरसत राहिला. ज्याचे थेट परिणाम वाहतूक आणि सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर पाहायला मिळाले. 

पावसाची एकंदर नोंद पाहता ठाण्यात यंदा गेल्या दहा वर्षांतील सर्वाधिक पाऊस पडला आहे. तुलनेने यंदा पाऊस उशिरा सुरु झाला असला तरी बुधवारपर्यंत शहरात ४१७०.२१ मिलीमीटर इतक्या प्रमाणात पावसाची नोंद झाली. मुख्य म्हणजे यंदाच्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक भागांना पुराचा फटका बसला. ज्यामध्ये नाशिक, कोल्हापूर, सांगली, कोकण पट्टा या सर्व भागांचा समावेश आहे. या भागांसोबतच रायगडमधीलही बऱ्याच ठिकाणी नद्यांची पाणी पातळी वाढल्यामुळे गावांमध्ये पाणी शिरुन मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं.