Mumbai News : मुंबईतील 7 रेल्वे स्थानकांची नावं बदलणार; नावं बदलाल, सुविधांचं काय?

Resolution To Change Mumbai Railway Station Names : मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याचा प्रस्ताव विधान परिषदेत एकमताने मंजुर करण्यात आलाय. मात्र नावं बदलून मुंबईकरांना रेल्वे स्थानकांवर सुविधा मिळणार आहेत का? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.

सौरभ तळेकर | Updated: Jul 10, 2024, 12:12 AM IST
Mumbai News : मुंबईतील 7 रेल्वे स्थानकांची नावं बदलणार; नावं बदलाल, सुविधांचं काय? title=
Resolution To Change Mumbai Railway Station Names

Mumbai Railway Station : मुंबईतील जवळपास सात रेल्वे स्थानकांची नावं बदलली जाणार आहेत. इंग्रजांच्या काळापासून असलेली या स्थानकांची नावं इतिहास जमा होणार आहेत. विधान परिषदेत दादा भुसे यांनी मांडलेला हा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. आता हा प्रस्ताव परवानगीसाठी केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे. मुंबईतील कोणत्या स्थानकांची नावं बदलली जाणार आहेत त्यावर एक नजर टाकूया.

रेल्वे स्थानकांचं नाव बदलण्याचा प्रस्ताव

करीरोड  -  लालबाग
सॅण्डहर्स्ट रोड  -  डोंगरी
मरीन लाईन्स  -  मुंबादेवी
चर्नीरोड  -  गिरगाव
कॉटनग्रीन  -  काळाचौकी
डॉकयार्ड  -  माझगाव
किंगसर्कल  -  तीर्थंकर पार्श्वनाथ

केंद्र सरकारची परवानगी मिळाल्यानंतर पुढल्या काही दिवसांमध्ये मुंबईतील या रेल्वे स्थानकांची नावं बदलली जातील. मात्र यामुळं मुंबईकरांची लोकलच्या त्रासातून सुटका होणार आहे का? लोकल सेवा आणि रेल्वे स्थानकांवर मुंबईकरांना चांगल्या सुविधा मिळणार का हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.

नावं बदलाल, सुविधांचं काय?

मुंबईकरांची लोकलच्या गर्दीतून कधी सुटका होणार? लोकलच्या फेऱ्या कधी वाढवल्या जाणार? पावसात लोकलची होणारी रखडपट्टी कधी थांबणार? रेल्वे स्थानकांवरील शौचालयांची सुधारणा कधी होणार? असे सवाल विचारले जात आहेत. एवढंच नाही तर, वारंवार घेतले जाणारे ब्लॉक कधी थांबणार? आणि लॅटफॉर्म आणि फलाटाच्या उंचीवर मुंबईकर कधीपर्यंत लक्ष ठेवणार? असा सवाल देखील मुंबईकर विचारत आहेत.

असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होता आहेत. त्यामुळे राज्यातील लोक प्रतिनिधींनी रेल्वेस्थानकांच्या नाव बदलासाठी जसा आग्रह धरला, पाठपुरावा केला. तसाच पाठपुरावा मुंबईच्या लोकल प्रवाशांसाठी केला तर मुंबईकर त्यांचे मनापासून आभार मानतील, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये.

दरम्यान, मुंबईची लाईफलाईन असलेल्या रेल्वेला आता लवकरच नवी ओळख मिळणार आहे. मुंबईतील रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलून नवी नावे द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. राज्य सरकारने तत्वतः मंजुरी दिली असून कॅबिनेट निर्णयानंतर राज्य सरकारच्या वतीने हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे.