Mumbai Drug Case : दोन जणांना न्यायालयाकडून दिलासा, जामीन मिळालेले 'ते' दोन जण कोण?

आर्यन खानची सुनावणी उद्यापर्यंत लांबणीवर पडली असताना याप्रकरणातील दोघांना आज जामीन देण्यात आला आहे

Updated: Oct 26, 2021, 07:45 PM IST
Mumbai Drug Case : दोन जणांना न्यायालयाकडून दिलासा, जामीन मिळालेले 'ते' दोन जण कोण? title=

मुंबई : मुंबई ड्रग्स पार्टी प्रकरणात (Mumbai Rave Party Case) दोन आरोपिंना सत्र न्यायालयाने जामीन दिला आहे. मनीष राजगरिया आणि अविन साहू यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे. आरोपी क्रमांक 11 मनीष राजगरिया याच्याकडे 2.4 ग्राम गांजा सापडला होता. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. मनीषचे वकील अजय दुबे यांनी दिलेल्या माहितीनुसार 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्याला जामीन देण्यात आला. मनीष राजगरिया बरोबरच अविन साहूलाही NDPS न्यायालयाने जामीन मंजूर केला. 

आर्यन खानच्या जामीनावर उद्या सुनावणी

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याच्या जामीन अर्जावर मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरु आहे. आज दुपारी अडीचनंतर संध्याकाळी कामकाज संपपर्यंत दोन्ही बाजूंच्या वकीलाचा युक्तीवाद सुरु होता. आता यावर उद्या दुपारी अडीच वाजल्यानंतर सुनावणी होणार आहे. याआधी 20 ऑक्टोबरला आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. 8 ऑक्टोबरपासून आर्यन मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये आहे.

दिल्लीतून एनसीबीची टीम मुंबईत येणार

दरम्यान, एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर पंच प्रभाकर साईल याने लावलेल्या आरोपांची एनसीबी मुख्यालयाने गंभीर दखल घेतली आहे. वानखेडे यांची खात्यामार्फत अंतर्गत चौकशीही सुरु आहे. समीर वानखेडे आज दिल्लीतील एनसीबी मुख्यालयात दोन तास उपस्थित होते. याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी एनसीबीची पाच जणांची टीम उद्या मुंबईत येणार आहे.