शनिवारी एकजूट, सोमवारी फाटाफूट? कसा असेल मविआचा जागावाटप फॉर्म्युला?

Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर मविआ जोमाने विधानसभेच्या कामाला लागलीय. शनिवारी संयुक्त पत्रकार परिषद घेत मविआच्या नेत्यांनी एकजुटीचा निर्धार केला. मात्र दोनच दिवसांमध्ये मविआच्या नेत्यांमध्ये जागावाटपावरून मतभेद सुरू झाल्याची चर्चा आहे. 

Updated: Jun 17, 2024, 08:16 PM IST
शनिवारी एकजूट, सोमवारी फाटाफूट? कसा असेल मविआचा जागावाटप फॉर्म्युला? title=

Maharashtra Assembly Election 2024 : आगामी विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) एकत्र लढेल, अशी घोषणा मविआच्या प्रमुख नेत्यांनी गेल्या शनिवारी केली. या घोषणेला 48 तास होत नाहीत तोच फाटाफूट सुरू झालीय. मविआतील तीन पक्ष किती जागांवर लढणार यावरून नेत्यांमध्ये मतभेद सुरू झाल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीचे नेते रोहित पवारांनी (Rohit Pawar) तर थेट 85 जागांची मागणी केली. जागावाटप करताना शिवसेना ठाकरे गट (Shivsena Thackeray Group) आणि काँग्रेसनं (Congress) मोठं मन करावं, अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखवली.

लोकसभेत मोठं मन दाखऊन आम्ही ठाकरे गट आणि काँग्रेसला जास्तीच्या जागा दिल्या. तशाच प्रकारे मोंठ मन दाखऊन त्यांनी देखील आता आम्हाला जास्तीच्या जागा द्याव्यात, अशी माझी कार्यकर्ता म्हणून इच्छा आहे. बाकी निर्णय हा शरद पवार साहेबांच्या आहे. कमीत कमी 85 आमदार निवडून आणण्याची जबाबदारी पवार साहेबांनी आमच्यावर सोपवली पाहिजे. आणि घटक पक्षांनी देखील या एवढ्या जागा निवडणूक आणण्यासाठी आम्हाला संधी दिली पाहिजे असं रोहित पवार यांनी म्हटलंय.

तर 2019 ला मविआची स्थापना झाली, तेव्हा शिवसेनेचेच जास्त आमदार होते अशी आठवण भास्कर जाधवांनी रोहित पवारांना करून दिलीय. रोहित पवार असो की नाना पटोले मी काही त्यावर बोलणार नाही. मी 45 वर्षांपासून राजकारणात आहे. मविआ स्थापन झाली तेव्हा शिवसेनेच्या जागा या तिन्ही पक्षांपेक्षा जास्त होत्या हे त्यांनी विसरू नये असं भास्कर जाधव यांनी सांगितलं.

 सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असेल, त्यावर एक नजर टाकुया
- काँग्रेस 100 ते 105 जागा
- शिवसेना ठाकरे गट - 90 ते 95 जागा 
- राष्ट्रवादी शरद पवार गट - 80 ते 85 जागा

दरम्यान, अद्याप जागावाटपाचा काहीही फॉर्म्युला ठरला नसल्याची माहिती काँग्रेस आमदार सतेज पाटलांनी दिलीय. नवीन टीम येणाऱ्या विधानसभेत दिसेल. विधानसभे संदर्भात अद्याप कोणताही फार्मूला ठरलेला नाही, तो राज्य पातळीवर निर्णय घेतला जाईल. कोल्हापुरात काय फॉर्म्युला असेल हे देखील ठरलेला नाही काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे माहाविकास आघाडीचा घटकपक्ष म्हणून एकत्रित ठरवतील, असं सतेज पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. 

जागावाटप ही आघाड्यांमधली दुखरी नस असते. कितीही एकजुटीच्या भीमगर्जना केल्या तरी जागावाटपावरून होणारं नाराजीनाट्य हा आतापर्यंतचा इतिहास आहे. लोकसभेलाही सांगलीवरून मविआत जोरदार वाद झाला. आता विधानसभा जागावाटपावरून पुन्हा संघर्षाची ठिणगी पेटायला लागलीय.