आमदार अपात्रतेबाबतची सुनावणी सोमवारपासून, सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर हालचालींना वेग

Maharashtra Politics : शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रेबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्लीत जाऊ कायदेशीर सल्लामसलत केली. त्यानंतर आता येत्या सोमवारपासून आमदार अपात्रतेबाबची सुनावणी सुरु होणार असल्याची माहिती मिळतेय

राजीव कासले | Updated: Sep 22, 2023, 02:01 PM IST
आमदार अपात्रतेबाबतची सुनावणी सोमवारपासून,  सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर हालचालींना वेग title=

Maharashtra Politics : शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतची (MLA Disqualification) सुनावणी सोमवारपासून होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. उद्या ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमत्री एकनाथ शिंदेंनाही (CM Eknath Shinde) नोटीस पाठवली जाणार आहे. तसंच सोमवारपासून दोन्ही गटाच्या आमदारांची सुनावणी घेतली जाणार आहे. मागील आठवड्यात सुनावणी सुरू झाली होती. त्यानंतर आमदारांनी एक आठवडा वेळ मागितला होता. ठरलेल्या वेळेनुसार सुनावणी होणार असल्याची माहिती विधानसभा अध्यक्षांनी दिलीय.

14 सप्टेंबरला आमदार अपात्रतेबाबतची सुनावणी विधानसभा अध्यक्षांसमोर झाली होती. यावेळी दोन्ही गटांनी आपली बाजू मांडली. यावेळी विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटांना कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी एक आठवड्याचा वेळ दिला. तर 18 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टात (Supreme Court) झालेल्या सुनावणीत कोर्टाने वेळ घ्यायला विलंब लागत असल्याबद्दल सुनावंलं. सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर आमदार अपात्रतेच्या याचिकांवरून हालचालींना वेग आलाय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिल्लीत जाऊन कायदेतज्ज्ञांची भेट घेतली आणि आमदार अपात्रता सुनावणीबाबत चर्चा केलीय. यावेळी निर्णय घ्यायला वेळ लावणार नाही .तसंच, घाई करून चालणार नाही असं नार्वेकर म्हणालेयत. 

तर अपात्रतेबाबत निर्णय घेण्यासाठी अध्यक्ष नार्वेकरांना दिल्लीत यावं लागत असेल तर आमच्या मनातल्या शंकांना बळ मिळतंय अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केलीय. राज्यात सुप्रीम कोर्टाच्या आदेशांचा सन्मान केला जात नाहीये अशी टीका त्यांनी केली. 

ठाकरे गट पुन्हा कोर्टात जाणार
शिवसेना ठाकरे गट पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात जायच्या तयारीत आहे. कारण विधानपरिषद आमदारांच्या अपात्रता सुनावणीवरुन पेच निर्माण झालाय. विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, मनिषा कायंदे आणि विप्लव बजोरिया या तिघांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. त्यामुळे या तिघांनाही अपात्र ठरवण्यासाठी अनिल परब यांच्याकडून विधिमंडळ सचिवालयात याचिका दाखल करण्यात आली. मात्र सभापतीपद रिक्त आहे. नीलम गोऱ्हे उपसभापती असल्यानं त्यांना याचिकेवरची सुनावणी घेता येणार नाही. त्यामुळे सुनावणी कोण घेणार असा कायदेशीर पेच निर्माण झालाय. त्यामुळे तिघांची आमदारकी रद्द करा यासंबंधीच्या याचिकेवरील सुनावणीला विलंब होतोय. आता विधानपरिषदेतील या कायदेशीर पेचासंबंधी ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी करतोय. 

काय आहे आमदार अपात्रतेचा मुद्दा?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंडखोरी करत आपला वेगळा गट स्थापन केला. शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्र ठरवावं, अशी मागणी ठाकरे गटान केली. या 16 आमदारांच्या अपात्रेसंदर्भात निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी न घेतल्याने ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती