महायुतीच्या जागावाटपाचं सूत्र ठरलं? लोकसभेचा स्ट्राईक रेट ठरणार विधानसभेचा फॉर्म्युला

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केलीय. मात्र सर्वांचं लक्ष लागलंय ते जागावाटपाकडे.. यातच महायुतीच्या गोटातून जागावाटपासंदर्भात मोठी बातमी हाती येतेय

राजीव कासले | Updated: Sep 16, 2024, 09:23 PM IST
महायुतीच्या जागावाटपाचं सूत्र ठरलं? लोकसभेचा स्ट्राईक रेट ठरणार विधानसभेचा फॉर्म्युला title=

Maharashtra Politics : विधानसभेआधी महायुतीत जागावाटपाबाबत खलबतं होताना दिसतायत. लोकसभेचा स्ट्राईक रेट आणि जिंकून येण्याची क्षमता हेच जागावाटपाचं सूत्र असल्याचं मोठं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय. अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या विधानाची आता चर्चा सुरु झालीय. दुसरीकडे महायुतीत जागावाटप स्ट्राईक रेटवर होणार नाही.. विधानसभेची जागा जिंकणं हाच जागावाटपाचा फॉर्म्युला असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत.

अनौपचारिक संवादात काय म्हणाले एकनाथ शिंदे?

स्ट्राईक रेट हेच जागावाटपाचं सूत्र? जिंकून येण्याची क्षमता जागावाटपाचं सूत्र?

लोकसभेत ज्याचा स्ट्राईक रेट जास्त त्याला सर्वाधिक जागा हे जागावाटपाचं सूत्र असेल

येत्या 8-10 दिवसात जागावाटपावर अंतिम निर्णय

महायुतीत जागावाटपाचा तिढा नाही

नोव्हेंबरमध्ये विधानसभेची निवडणूक होण्याचे संकेत

दोन टप्प्यात विधानसभा निवडणूक होण्याचे संकेत

नोव्हेंबरमध्ये विधानसभा होणार असून दोन टप्प्यात मतदान होणार असल्याचं शिंदे अनौपचारिक गप्पांमध्ये म्हणालेत..

लोकसभेत कोणत्या पक्षाचा किती स्ट्राईक रेट होता पाहुयात.

शिवसेना शिंदे गटाने लोकसभेत 15 जागा लढवल्या, त्यापैकी 7 जिंकल्या स्ट्राईक रेट – 46%

भाजपने २८ जागा लढवल्या त्यापैकी 9 जिंकल्या स्ट्राईक रेट - 33%

राष्ट्रवादी अजित पवार गटाने ४ जागा लढवल्या त्यापैकी १ जिंकली स्ट्राईक रेट – 24%

जे प्रमुख व्यक्ती आहेत त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. शेवटी चर्चेतून मार्ग निघेल. दरम्यान निवडणूक कधी घ्यायची हा निवडणूक आयोगाचा अधिकार आहे.. किती टप्प्यात निवडणूक घ्यायची हा आयोगाचा अधिकार असल्याचं अजित पवार म्हणालेत. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या स्ट्राईक रेटच्या अनौपचारिक गप्पांवरुन संजय राऊतांनी जोरदार टोला लगावलाय. ह्यांचा कसला स्ट्राईक रेट, ह्यांचा गद्दारीचा स्ट्राईक रेट सर्वाधिक असल्याचं राऊतांनी म्हटलंय.

लोकसभा निवडणुकीत भाजपने सर्वेक्षणाचे आकडे दाखवले होते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उमेदवार बदलण्यास भाग पडलं होतं. त्याचा फटकाही बसला होता. मात्र आता विधानसभेला उमेदवार निवडताना लोकसभेचा स्ट्राईक रेट आणि जिंकून येण्याची क्षमता हाच निकष असणार असल्याचे संकेतच मुख्यमंत्र्यांनी दिलेत..