'दूरदर्शनचे १२ तास, रेडिओचे २ तास द्या', शिक्षणमंत्र्यांची केंद्र सरकारकडे मागणी

कोरोनाच्या सावटामुळे राज्यातील शाळा लवकर सुरू होण्याची शक्यता नाही

Updated: May 29, 2020, 04:12 PM IST
'दूरदर्शनचे १२ तास, रेडिओचे २ तास द्या', शिक्षणमंत्र्यांची केंद्र सरकारकडे मागणी title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : कोरोनाच्या सावटामुळे राज्यातील शाळा लवकर सुरू होण्याची शक्यता नाही, त्यामुळे आता टीव्ही आणि रेडिओवरून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची तयारी राज्य सरकारने सुरू केली आहे. त्यासाठी दूरदर्शनचे १२ तास, तर रेडिओचा दोन तासाचा वेळ राज्य सरकारला द्यावा, अशी मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत केंद्र सरकारला पत्र लिहलं आहे.

कोरोनामुळे राज्यातील शाळा सुरू होणार की नाही, असा प्रश्न चर्चेत आहे. मात्र राज्य सरकारनं प्रत्यक्ष शाळा न सुरू करता, वर्ग न भरवता शाळा सुरू करण्याच्या दिशेनं काम सुरू केलं आहे. आगामी शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना टीव्ही आणि रेडिओवरून शिक्षणाचे धडे देण्याची तयारी राज्य सरकारे केली आहे. दूरदर्शन आणि रेडिओवरून शिक्षणाचे हे कार्यक्रम प्रसारित करण्यासाठी राज्य सरकारला दूरदर्शन आणि रेडिओवरचा वेळ हवा आहे.

विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक आणि कर्मचार्‍यांना पगार द्या, अन्यथा....

राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाला यासंदर्भातील पत्र पाठवलं आहे. 'राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने डिजिटल शिक्षणाच्या दृष्टीकोनातून प्राथमिक ते माध्यमिक वर्गासाठी एक हजाराहून अधिक तासांची डिजिटल शिक्षण साहित्य संग्रहित केली आहे. त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षात दूरदर्शनच्या दोन वाहिन्यांवरून दररोज १२ तास, तर ऑल इंडिया रेडिओवरून दोन तास शैक्षणिक अभ्यासक्रमाचं प्रसारण करण्याची राज्य सरकारची तयारी आहे,' असं वर्षा गायकवाड यांनी पत्रात म्हटलं आहे.

कोरोनामुळे मुंबईत दोन टप्प्यात होणार शैक्षणिक वर्षाची सुरूवात

राज्यात १५ जूनपासून सर्व शाळा सुरू करणं अशक्य - शिक्षणमंत्री