मविआचं लोकसभा जागावाटप ठरलं, मुंबईत ठाकरे गट 'इतक्या' जागा लढवणार, शरद पवार गटाला कमी जागा

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील सर्व 48 जागांबाबत चर्चा करण्यात आली. ही चर्चा सकारात्मक झाल्याचं मविआ नेत्यांनी सांगितलं.

कृष्णात पाटील | Updated: Jan 25, 2024, 07:16 PM IST
मविआचं लोकसभा जागावाटप ठरलं, मुंबईत ठाकरे गट 'इतक्या' जागा लढवणार, शरद पवार गटाला कमी जागा title=

Loksabha Election 2024 : मुंबईत महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadhi) महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election 2024) रणनिती ठरवण्यात आली. तसंच जागावाटपाबाबत सकारात्म चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. जागावाटपात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (SSUBT) पक्षाला सर्वाधिक जागा मिळणार असल्याची माहिती आहे. तर त्या पाठोपाठ काँग्रेसला (Congress) जागा मिळणार. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP Sharad Pawar) तिसऱ्या नंबरवर असणार आहे. 

मुंबईतील सहा पैकी चार लोकसभा मतदारसंघात शिवसेना लढणार आहे. दक्षिण मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई आणि ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे जाणार आहेत.  तर महाविकास आघाडीतील वंचित बहुजन आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांना प्रत्येकी एक जागा सोडणार. या दोन्ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कोट्यातूनच दिली जाणार असल्याची माहीती सूत्रांनी दिलीय. 

महाविकास आघाडीच्या बैठकीत काही मतदारसंघाबाबत रस्सीखेच सुरू आहे. मतदारसंघ जिंकण्यासाठी तुल्यबळ उमेदवार ज्यांच्याकडे असेल त्या पक्षाला तो मतदारसंघ दिला जाण्यावर एकमत करण्यात झालंय. महाविकास आघाडीच्या बैठकीत राज्यातील काही लोकसभा मतदारसंघावरून चर्चा सुरु आहे. तर काही  मतदारसंघांची अदलाबदल होवू शकते.

'मविआ मजबूत आणि एकसंघ'
महाविकास आघाडी मजबूत आणि एकसंघ असल्याची प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी बैठकीनंतर दिली. या बैठकीत महाराष्ट्रातील सर्व 48 जागांवर सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाशिवाय सीपीआय, सीपीएमचे नेतेही उपस्थित होते अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. 

काही लोकं देव पाण्यात घालून बसले असतील, त्यांना महाविकास आघाडीत सर्व काही सुखरुप असल्याचा संदेश द्या असा टोला संजय राऊत यांनी लगावला. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याशीही चर्चा सुरु आहे. तीस तारखेच्या पुढच्या बैठकीत प्रकाश आंबेडकर सहभागी होणार आहेत, वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीतील महत्त्वाचा घटक असल्याची माहितीही संजय राऊत यांनी दिली. 

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि पंजाबमध्ये आपसोबत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपावरून काँग्रेससोबत एकमत झाले नाही. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी 'इंडिया' आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महाविकास आघाडी काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.