उर्मिलांपाठोपाठ कृपाशंकर सिंह यांनीही काँग्रेसचा हात सोडला

 माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांचा काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा 

Updated: Sep 10, 2019, 07:42 PM IST
उर्मिलांपाठोपाठ कृपाशंकर सिंह यांनीही काँग्रेसचा हात सोडला title=

मुंबई : मुंबई काँग्रेसला आज दोन मोठे धक्के बसले आहेत. उर्मिला मातोंडकरांपाठोपाठ मुंबईतले उत्तर भारतीय काँग्रेस नेते आणि माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींना त्यांनी आपला राजीनामा पाठवल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत काँग्रेसच्या छाननी समितीची बैठकीत काश्मीरसंदर्भात काँग्रेसच्या भूमिकेबाबत कृपाशंकर यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आणि बाहेर आल्यानंतर थेट राजीनामाच सोपवला. कृपाशंकर हे मुंबई काँग्रेसचा उत्तर भारतीय चेहरा होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता त्यांच्या भाजपा प्रवेशाकडे लक्ष लागले आहे.

छाननी समितीच्या बैठकीला उपस्थित राहिले. मुंबईतील उमेदवारांचे नाव सांगा असा प्रश्न बैठकीत विचारल्यावर कागद बाहेर राहिला आहे. उमेदवाराचे नाव घेऊन येतो म्हणून कृपा शंकर सिंग बाहेर पडले. त्यानंतर ते परतलेच नाही. थोड्या वेळाने त्यांनी मल्लिकार्जुन खरगे आणि सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा पाठवल्याचे समजले. कृपा शंकर सिंग यांनी राजीनामा देताना काश्मीरमधील ३७० कलम संदर्भात काँग्रेसने योग्य बाजू घेतली नसल्याचे कारण पुढे केले आहे. त्यांनी राष्ट्रहिताचा विचार करून राजीनामा दिल्याचा टोमणा एकनाथ गायकवाड यांनी लगावला.

मिलिंद देवरा आज बैठकीला आले नव्हते. त्यांनी आपले मत ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे कळवले आहे. देवरा नाराज नाही तसेच काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र नसल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. 

उर्मिला नाराज 

उर्मिला मातोंडकर यांनीही आज काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. उर्मिला यांना काँग्रेसमध्ये येऊन जेमतेम सहा महिने झाले होते. त्यांनी मिलिंद देवरांना लिहिलेलं पत्र सार्वजनिक करण्यात आले. त्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. या पत्रामध्ये उर्मिला यांनी संजय निरुपम यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. त्याबाबत कोणतीही कारवाई न झाल्याने नाराज झालेल्या उर्मिला यांनी राजीनामा दिला.