कालिदास कोळंबकर, वैभव पिचड यांचाही आमदारकीचा राजीनामा

काँग्रेस-राष्ट्रवादीला आणखी एक झटका

Updated: Jul 30, 2019, 01:00 PM IST
कालिदास कोळंबकर, वैभव पिचड यांचाही आमदारकीचा राजीनामा title=

मुंबई : काँग्रेसचे मुंबईतील आमदार कालिदास कोळंबकर यांनी आपल्या आमदाराकीचा राजीनामा दिला आहे. याआधी त्यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्याचा राजीनामा दिला होता. विधानसभा अध्यक्षांकडे कालिदास कोळंबकर आणि राष्ट्रवादीचे आमदारा वैभव पिचड यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. यावेळी गिरीश महाजन देखील त्यांच्या सोबत होते.

काँग्रेस आमदार कालीदास कोळंबकर हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होत्या. पण आज यावर शिक्कामोर्तब झाले. कोळंबकर मुंबईतील वडाळा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार होते. यापूर्वीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत घोषणा केली होती, तर त्यांच्या संपर्क कार्यालयावरील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो लावले होते. शिवसेना सोडून 2005 साली कोळंबकरांनी नारायण राणेंसोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता काँग्रेसला रामराम करून कोळंबकर भाजपमध्ये जात आहेत. 

दुसरीकडे राष्ट्रवादीला आणखी एक धक्का लागला आहे. अकोले येथील आमदार वैभव पिचड हे देखील आता भाजपमध्ये जाणार आहेत. त्यांच्यासोबत याआधी अनेक कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. 

आज याआधी साताऱ्यातील राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. याआधी सचिन आहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला लागोपाठ झटके देण्याची काम भाजप आणि शिवसेनेकडून होत आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडीसाठी ही चांगली बातमी नाही. अनेक मोठे नेते हे शिवसेना आणि भाजपमध्ये गेल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीचं टेन्शन नक्कीच वाढलं आहे.

नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे ५२ नगरसेवक पक्षाला रामराम करणार असल्याचे सांगितले जात आहे. सोबतच राष्ट्रवादीचे मोठे नेते गणेश नाईक हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जातंय.