विद्यापीठ अंतिम वर्ष परीक्षा : एटीकेटी, बॅकलॉगबाबत मंत्र्यांचे स्पष्टीकरण

आशिष शेलार यांचं राज्यपालांना निवेदन

Updated: Jun 2, 2020, 04:07 PM IST
विद्यापीठ अंतिम वर्ष परीक्षा : एटीकेटी, बॅकलॉगबाबत मंत्र्यांचे स्पष्टीकरण title=
फाईल फोटो

मुंबई : विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेवर सरकारने तोडगा काढला असला तरी त्याबाबत शंका आणि आक्षेप अजूनही सुरुच आहेत. अभाविपने परीक्षा न घेण्याच्या कृतीला आक्षेप घेतला आहे, तर भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेऊन राज्य सरकारचा निर्णय विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा असल्याचा आक्षेप घेत निवेदन दिले आहे. तर एटीकेटी आणि बॅकलॉगबाबत विद्यार्थ्यांच्या मनात शंका असल्या तरी त्याबाबत योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ, असं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.

विद्यापीठाच्या अंतिम वर्षाची परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना श्रेणी देऊन पदवी प्रदान करण्याच्या निर्णयाला राज्यपालांनी आधी आक्षेप घेतला होता. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंची बैठक घेऊन चर्चा केली आणि त्यावर तोडगा काढला. राज्य सरकारच्या नव्या निर्णयानुसार राज्य सरकारने विद्यार्थ्यांना दोन पर्याय दिले आहेत. त्यापैकी पहिला म्हणजे परीक्षा न घेता आतापर्यंतच्या सेमिस्टरच्या गुणांची सरासरी काढून श्रेणी देऊन विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्याचा पर्याय आहे. तर ज्यांना हा पर्याय अन्यायकारक वाटतो त्यांना नंतर परीक्षा देण्याचा पर्यायही सरकारने दिला आहे. कोरोनाचे संकट पाहता जेव्हा परीक्षा घेणं शक्य होईल, तेव्हा विद्यार्थी परीक्षा देऊ शकतील.

मात्र सरकारचा हा निर्णय सपशेल चुकीचा असून अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा असल्याची भूमिका भाजपने घेतली आहे. भाजप नेते आशिश शेलार यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेऊन निवेदन दिले. गुण सुधारणेबाबत घेतलेल्या निर्णयात स्पष्टता नसून तो गोंधळ वाढवणारा आणि साफ चुकीचा निर्णय आहे, अशी टीका शेलार यांनी केली आहे.

 

दरम्यान, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी एटीकेटी आणि बॅकलॉगबाबत विद्यार्थ्यांच्या मनात असलेला संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला. याबाबत विद्यार्थ्यांनी चिंता करू नये. विद्यार्थ्यांची सरकारला काळजी आहे. यावर मार्ग काढण्यासाठी चर्चा सुरु असून योग्य वेळी विद्यार्थी हिताचा निर्णय जाहीर करू, असे सामंत यांनी ट्वीट करून सांगितले आहे.