पहिल्याच पावसात मुंबईची दैना; तिघांचा मृत्यू

दादरमधील फुल मार्केटमध्ये भिंत कोसळून तीनजण जखमी झाले.

Updated: Jun 28, 2019, 08:10 PM IST
पहिल्याच पावसात मुंबईची दैना; तिघांचा मृत्यू title=

मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरात अखेर शुक्रवारी मान्सून जोरदार बरसला. मात्र,  मान्सूनच्या या पहिल्यात पावसात मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले. तर अनेक ठिकाणी शॉर्टसर्किट, झाडे कोसळणे अशा घटना घडल्या. यामध्ये तीन व्यक्तींचा मृत्यू झाला. 

दादरमधील फुल मार्केटमध्ये भिंत कोसळून तीनजण जखमी झाले. त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर दुसरीकडे वीजेचा धक्का लागल्याने तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अंधेरी आणि गोरेगाव परिसरात ही दुर्घटना घडली. 

मुंबई शहरात एका ठिकाणी, पूर्व उपनगरात २ तर पश्चिम उपनगरात ६ ठिकाणी अशा एकूण ९ शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या आहेत. आज सकाळी  अंधेरी पश्चिमेकडील अण्णा नगर, आरटीओ ऑफिससमोर काशिमा युडियार (६०) महिलेचा विजेचा धक्काला लागून मृत्यू झाला. तर गोरेगाव पूर्व येथे महाकाली केव्ह्स रोड येथे सकाळची ७.५६ वाजताच्या दरम्यान विजेचा धक्का बसून चार जण जखमी झाले. या सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राजेंद्र यादव (६) आणि संजय यादव (२४) अशी या मृतांची नावे आहेत. 

आज सकाळपासूनच पावसाने मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण या भागांमध्ये जोरदार हजेरी लावली. काही काळ वगळता आज दिवसभर पाऊस सतत कोसळत होता. त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी तुंबले होते. यामुळे रस्ते वाहतूक विस्कळीत होताना दिसली. तर पावसाच्या वाहतुकीमुळे रेल्वेचाही खोळंबा झाला. पावसामुळे रेल्वेचे दिवसभरातील वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले होते.