तीन पक्षांच्या आघाडी सरकारला अडचणीत आणणाऱ्या त्या तीन अमराठी नेत्यांचा जाणून घ्या इतिहास...

एका मागोमाग एक तारखा येत राहिल्या पण आघाडी सरकार काही कोसळलं नाही. मग, या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करून अडचणीत आणण्यात आलं. यात भाजपचे दोन अमराठी नेते आघाडीवर होते. तर, अपक्ष निवडून आलेल्या एक खासदार यांनीही सरकारविरोधात आघाडी उघडली.

Updated: May 6, 2022, 05:12 PM IST
तीन पक्षांच्या आघाडी सरकारला अडचणीत आणणाऱ्या त्या तीन अमराठी नेत्यांचा जाणून घ्या इतिहास... title=

मुंबई : महाराष्ट्रात भाजपचं संख्याबळ जास्त असूनही शिवसेना ( Shivsena ), राष्ट्रवादी ( NCP ) आणि काँग्रेस ( Congress ) यांची युती होऊन महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं. तीन पक्षाच्या या आघाडी सरकारला सत्तेत येऊन काही दिवस होत नाही तोच हे सरकार सहा महिन्यात कोसळणार असं भाकीत विरोधी पक्ष नेते देवेंद फडणवीस ( Devendra Fadnvis ) यांनी वर्तवलं. 

एका मागोमाग एक तारखा येत राहिल्या पण आघाडी सरकार काही कोसळलं नाही. मग, या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करून अडचणीत आणण्यात आलं. यात भाजपचे दोन अमराठी नेते आघाडीवर होते. तर, अपक्ष निवडून आलेल्या एक खासदार यांनीही सरकारविरोधात आघाडी उघडली.

हे नेते आहेत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या ( Kirit Somaiya ), भाजपचे उत्तर भारतीय मोर्चा युनिटचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज ( Mohit Kamboj ) आणि खासदार नवनीत राणा..  ( Navneet Rana ) या नेत्यांचा राजकीय प्रवास कसा सुरु झाला याबद्दल थोडसं...

कोणत्याही प्रकरणाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी थेट संबंध जोडून नित्यनियमानं आघाडी सरकारचे मंत्री यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या याचा राजकीय प्रवास.. 

जयप्रकाश नारायण यांच्या विद्यार्थी आंदोलनांमधून सोमय्याच्या राजकीय आयुष्याला सुरुवात झाली. १९८० च्या काळात अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी यांच्या हिंदुत्ववादी विचारसरणीने ते प्रभावित झाले आणि त्यांनी भाजपात प्रवेश केला.

नवरात्री उत्सवात गरबा, दांडिया खेळायला संपूर्ण तरुणाई रात्री रस्त्यावर उतरायची. सोमय्या यांनी गरब्याला व्यावसायिक स्वरूप दिलं. मुंबईतील अनेक गुजरातीबहुल भागांमध्ये त्यांनी गरब्यांचे कार्यक्रम आयोजित केले. त्यामुळे गरबा किंग अशी त्यांची ओळख निर्माण झाली.

तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण आडवाणी यांनी त्यांच्या एका गरबा कार्यक्रमाला हजेरी लावली. अडवाणींनी नृत्यही केलं. त्याची सर्वात जास्त चर्चा झाली. या घटनेमुळे सोमय्या एकदम प्रसिद्धीझोतात आले. भाजपच्या वरिष्ठ वर्तुळात त्यांची उठबस होऊ लागली. सोमय्या यांनी छोटे-छोटे मुद्दे घेत अधिकाऱ्यांना नडायला सुरुवात केली.

१९९५ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने सोमय्यांना उमेदवारी दिली. ही निवडणूक जिंकत सोमय्या यांनी पहिल्यांदा विधानसभा गाठली. १९९९ साली त्यांनी गुरुदास कामत यांचा प्रभाव केला. ईशान्य मुंबई मतदारसंघाचे ते खासदार झाले. त्यानंतर पुन्हा २०१४ ला ते पुन्हा खासदार म्हणून निवडून आले.

२०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेने त्यांच्याविरोधात आंदोलन केल्यामुळे त्यांचे तिकीट कापण्यात आलं. पण, उद्धव ठाकरे यांनीच त्यांचे तिकीट कापले अशी चर्चा होती. त्यानंतर आघाडी सरकारविरोधात त्यांनी रणशिंग फुंकत भ्रष्टाचाराची बाहेर काढण्याची मालिकाच सुरु केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री मंडळातील नवाब मलिक, अनिल परब, आदित्य ठाकरे असे अनेक नेते त्यांच्या रडारवर आहेत. अलीकडेच त्यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यामुळे राज्यातले राजकारण पेटलं होतं.

आर्यन खान ड्रग्स प्रकरण, भोंगा अन हनुमान चालीसाचा वाद आणि मातोश्री परिसरात गाडीवर झालेल्या हल्ल्यामुळे चर्चेत आलेलं आणखी एक नाव म्हणजे मोहित कंबोज

मोहित कंबोज यांचा जन्म उत्तर प्रदेशातील वाराणसीमधला. त्यांचं शालेय शिक्षण तिथेच तर कॉलेजचं शिक्षण मुंबईत झालं. त्यांचे आजोबा आणि वडिल यांचा उत्तर प्रदेशमध्ये हिरे, सोन्याचा व्यवसाय आहे. २००२ मध्ये ते मुंबईत आले. वयाच्या २१ व्या वर्षी KBJ ग्रुप नावाने सराफा व्यवसाय सुरु केला.

सोने आणि दागिन्यांचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांची संघटना बॉम्बे बुलियन असोसिएशन याचे ते पहिले अध्यक्ष आणि नंतर राष्ट्रीय अध्यक्ष झाले. २०१३ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चा युनिटचे अध्यक्ष आणि २०१४ मध्ये त्यांना मुंबई भाजपचे उपाध्यक्ष पद देण्यात आले. 

२०१४ साली दिंडोशी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली. त्यावेळी महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची चर्चा झाली होती. पण, त्यांचा शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी पराभव केला. २०१६ मध्ये भाजपने त्याची नियुक्ती भारतीय युवा मोर्चा अध्यक्षपदी केली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत त्यांनी स्वतःचं आडनाव बदलून मोहित भारतीय असं केलं. 

देवेंडे फडणवीस यांच्या प्रचाराची त्यांनी आखणी केली. फडणवीस या निवडणुकीत हरले तर राजकारण सोडून देईल असं ते म्हणाले होते. फडणवीस निवडून आले पण सत्ता काही मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या सगळ्या पदांचा राजीनामा दिला. त्यानंतर आर्यन खान ड्रग्स ते हनुमान चालीसा प्रकरण यात त्यांचे नाव समोर आल्याने मोहित पुन्हा चर्चेत आलेत.

अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा या मूळ पंजाबमधल्या..

कुटूंब मूळचं पंजाबचं असलं तरी ते मुंबईतच रहायला होतं. त्यामुळे मुंबईची आणि त्यान्ची नाळ जुळली. त्यांचे वडिल सैन्यात मोठ्ठे अधिकारी पण नवनीत यांना फिल्म इंडस्ट्रीत करियर करायचं होतं. त्यांनी साऊथ चित्रपटात काम करता करता पहिल्या फळीतल्या अभिनेत्रींच्या यादीत जाऊन पोहोचल्या. 

रामदेवबाबांच्या योग शिबिरात आमदार रवी राणा यांच्याशी त्याची ओळख झाली. ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि विवाहबद्ध झाले. २०११ अमरावती येथे सामुदायिक विवाह सोहळ्यात त्यांचं लग्न झालं. पती आमदार असल्याने त्यांचा राजकीय फायदा नवनीत राणा यांना झाला.

मुंबईतच लहानच्या मोठ्या झाल्या त्यामुळे त्यांना मराठी उत्तम येत होतं. अन हळूहळू त्या महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय झाल्या. त्यांचे पती म्हणजेच बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या राजकीय पार्श्वभूमीचा नवनीत राणा यांना फायदाच झाला. 

२०१४ साली लोकसभा निवडणूक लढविली. पण शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांच्याकडून त्या पराभूत झाल्या. तर २०१९ च्या निवडणूकीत त्यांना राष्ट्रवादीचे समर्थन मिळाले आणि त्या खासदार झाल्या. परंतु, लोकसभेत जाताच त्यांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळेच जेव्हा संधी मिळत तेव्हा त्या राज्यातील आघाडी सरकारवर टीका करत राहिल्या. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हनुमान चाळीस पठण करण्याचे आवाहन केले. त्या वादात राणा दाम्पत्यांनी उडी घेतली. मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचणार अशी घोषणा केली. त्यामुळे त्या अधिक चर्चेत आल्या. शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर खडा पहारा देत राणा दाम्पत्यांला तिकडे फिरू दिले नाही. तर, पोलिसांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल त्यांना अटक केली. या सर्व घडामोडींमुळे नवनीत राणा यांचे राजकीय अस्तित्व वाढले.