मुख्यमंत्री ठाकरेंच्या कर्जमाफीवर शेतकऱ्यांची नाराजी - राजू शेट्टी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कर्जमाफीवर शेतकरी पूर्णपणे नाराज आहेत. 

Updated: Dec 28, 2019, 11:37 AM IST
मुख्यमंत्री ठाकरेंच्या कर्जमाफीवर शेतकऱ्यांची नाराजी - राजू शेट्टी title=

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कर्जमाफीवर शेतकरी पूर्णपणे नाराज आहेत. या कर्जमाफीची एकूण रक्कम 7 ते 8 हजार कोटीच्या वर जाणार नाही. मग ही कर्जमाफी नेमकी कुणासाठी आहे? असा सवाल माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे.

2  लाखापेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळणार नाही, असा नियम लावला आहे. यामुळे अनेक शेतकरी अपात्र होतील. या योजनेचा त्यांना लाभ मिळणार नाही. अधिकाऱ्यांच्यावर विश्वास ठेवून केलेली कर्जमाफी ही चुकीची असल्याचे मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं आहे.

कर्जमाफीचा शासन निर्णय

राज्यातील शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा शासन निर्णय शुक्रवारी जारी करण्यात आला. त्यानुसार महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना आता राज्यात लागू झालीय. 

नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब झालं. या योजनेनुसार १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंतचे २ लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज माफ होणार आहे. 

योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्यामध्ये वित्त नियोजन विभाग व सहकार विभागाचे सचिव, रिझर्व्ह बँक, नाबार्ड आणि राष्ट्रीयकृत बँकांच्या प्रतिनिधींचा समावेश असेल. 

राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा बँक, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था यांच्या मार्फत घेतलेलं कर्ज माफ केलं जाणार आहे.