Good News : राज्याची मागणी मान्य, आता 'या' कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची परवानगी

केंद्र सरकार आणि वेगवेगळी कार्यालये-आस्थापना, उच्च न्यायालये आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँक यामधील कर्मचाऱ्यांना लोकलचा प्रवास करता येणार आहे.  

Updated: Jul 1, 2020, 07:50 AM IST
Good News : राज्याची मागणी मान्य, आता 'या' कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची परवानगी  title=

मुंबई : केंद्र सरकार आणि वेगवेगळी कार्यालये-आस्थापना, उच्च न्यायालये आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँक यामधील कर्मचाऱ्यांना लोकलचा प्रवास करता येणार आहे. त्यामुळे आता राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. राज्य सरकारने रेल्वे मंत्र्यालयाकडे राज्य सरकारबरोबरच केंद्र सरकारच्या आणि वेगवेगळ्या कार्यालयातील कर्मचारी आणि सार्वजनिक बँक कर्मचाऱ्यांना प्रवास करण्याबाबत विनंती करण्यात आली होती, ती मागणी मान्य झाली आहे.

आजपासून मुंबई उपनगरीय लोकलमधून केंद्रीय, राज्य सरकारचे कर्मचारी यांना प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. तसेच राष्ट्रीयकृत बँका, मुंबई पोर्ट ट्रस्ट, न्यायालयीन कर्मचारी, राज भवन कर्मचारी यांचाही यामध्ये समावेश आहे. अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांनीही लोकलने प्रवास करता येणार आहे. 

केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. ही मुभा आज १ जुलैरपासून देण्यात आली आहे. एवढेच नाही तर बुधवारपासून मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरच्या लोकल फेऱ्यांमध्ये वाढही करण्यात आली आहे, असंही पियूष गोयल यांनी स्पष्ट केले आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांसोबतच संरक्षण विभाग, आयकर विभाग, जीएसटी, कस्टम, पोस्ट खात्यातील कर्मचारीही लोकलमधून प्रवास करु शकतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर एकूण २०० लोकल फेऱ्या होतात. त्यात आणखी १५० फेऱ्यांची भर पडली आहे. त्यामुळे १ जुलैपासून मध्य रेल्वेवर ३५० लोकल फेऱ्या होतील.

पश्चिम रेल्वेवरही २०२ लोकल फेऱ्या होत असून यामध्ये बुधवारपासून १४८ फेऱ्या वाढवण्यात आल्याची माहितीही गोयल यांनी दिली. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरही ३५० फेऱ्या होणार आहेत.