'कोरोना टेस्ट, मास्कची उगाच मागणी करु नका'; आरोग्यमंत्र्यांचं आवाहन

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसची महाराष्ट्रातही एन्ट्री झाली आहे.

Updated: Mar 12, 2020, 09:38 PM IST
'कोरोना टेस्ट, मास्कची उगाच मागणी करु नका'; आरोग्यमंत्र्यांचं आवाहन title=

मुंबई : जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसची महाराष्ट्रातही एन्ट्री झाली आहे. राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १४ वर पोहोचली आहे. पुण्यामध्ये कोरोनाचे ९ रुग्ण, मुंबईत ३, ठाण्यात १ आणि नागपूरमध्ये १ रुग्ण आढळले आहेत. राज्यामध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण असले, तरी घाबरून जायचं कारण नाही, अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यात फक्त ३ प्रयोगशाळांमध्येच कोरोनाच्या टेस्ट केल्या जात आहेत. संशयीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे टेस्टचे रिपोर्ट यायलाही वेळ लागत आहे. तसंच या प्रयोगशाळांवर ताण पडतोय, म्हणून नागरिकांनी उगाच कोरोना टेस्ट करायला जाऊ नये. एन-९५ मास्कची मागणीही करु नये, असं आवाहन आरोग्य मंत्र्यांनी केलं आहे.

कोणताही शासकीय कार्यक्रम किंवा सार्वजनिक गॅदरिंग घ्यायचं नाही, अशा सूचना तहसिलदारांना केल्याचं राजेश टोपेंनी सांगितलं. पर्यटकांना परदेशात घेऊन जाऊ नका. तसंच परदेशातून आलेल्या नागरिकांची यादी आरोग्य विभागाला द्या, असं टूर ऑपरेटरना सांगण्यात आल्याचं राजेश टोपे म्हणाले.

केंद्र शासनाने दिलेल्या माहितीनुसार ७ अतिबाधित देशांमधून येणाऱ्या रुग्णांची तपासणी केली जात आहे. शाळा-महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय अजून घेण्यात आलेला नाही, पण गरज पडली तर दोन-तीन दिवसात याबाबत निर्णय घेऊ, असं वक्तव्य राजेश टोपेंनी केलं.