कोरोनाचा फैलाव : सोशल मीडियावरुन अफवा पसरवाल तर खबरदार, महाराष्ट्र सायबरचा इशारा

सोशल मीडियावरुन कोणतीही अफवा पसरवली तर सक्त कारवाई करण्याचे आदेश, महाराष्ट्र रायबर पोलिसांनी दिले आहेत.

Updated: Mar 21, 2020, 02:43 PM IST
कोरोनाचा फैलाव : सोशल मीडियावरुन अफवा पसरवाल तर खबरदार, महाराष्ट्र सायबरचा इशारा title=

मुंबई : राज्यात दिवसागणिक कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यात कोरोना व्हायरसचा फैलाव थांबण्याचे नाव घेत नाही. राज्यात ६३ रुग्ण बाधित असल्याचे पुढे आले. नव्याने ११ रुग्णांची भर पडली आहे. देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहे. त्यामुळे राज्य सरकारने मोठी खबरदारी घेतली आहे. कोणीही गर्दी करु नये, आवश्यक असेल तर प्रवास करावा अन्यथा करु नये, असे सक्त आदेश दिले आहेत. दरम्यान, सोशल मीडियावरुन कोणतीही अफवा पसरवली तर सक्त कारवाई करण्याचे आदेश, महाराष्ट्र रायबर पोलिसांनी दिले आहेत.

कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता जमाव बंदीचा आदेशही जारी करण्यात आला आहे. असे असताना कोरोनाच्या भितीने अनेक जण गावाला जाण्याला प्राधान्य देत असल्याचे चित्र मुंबईतील एलटीटी, कल्याण आणि पुणे येथील रेल्वे स्थानकांवर दिसून येत आहे. रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी दिसून येत आहे. दरम्यान, कोरोनाच्या खोट्या बातम्या आणि अफवांपासून दूर राहण्याचे महाराष्ट्र सायबरने आवाहन केले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खोट्या बातम्या आणि अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन महाराष्ट्र सायबरने केले आहे. 

समाजमाध्याम फेसबुक, व्हॉट्स अॅप, इंस्टाग्राम, ट्विटर, युट्युब, टिकटॉक आदींवरुन कुठल्याही प्रकारच्या खोट्या बातम्या, अफवा पसरवू नये असे आवाहन करण्यात आले आहे. अशा अफवा आणि खोट्या बातम्या पसरविणाऱ्यांच्या विरोधात सहा महिन्यांपर्यंत कैद आणि हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची कारवाई करण्याचा इशाराही महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाने दिला आहे. 

तसेच अफवा पसरवणाऱ्या लोकांच्या तक्रारी जवळच्या स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये किंवा www.cybercrime.gov.in यावर नोंदवाविण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.