वसूली आली की 'ससा' होतो, मदत म्हटलं की 'कासव'! देवेंद्र फडणवीस यांची आघाडी सरकारवर टीका

शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीचे आकडे पाहून देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे

Updated: Oct 8, 2021, 06:33 PM IST
वसूली आली की 'ससा' होतो, मदत म्हटलं की 'कासव'!  देवेंद्र फडणवीस यांची आघाडी सरकारवर टीका title=

मुंबई : भाजप नेते आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भाची (Vidharbha) पाहणी केली. यावर बोलताना फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadhi Government) जोरदार टीका केली. राज्यातील शेतकरी संकट आहे, मात्र महाविकास आघाडी सरकारकडून काहीही मदत जाहीर झालेली नाही, शेतकऱ्यांना (Farmer) तात्काळ मदत हवी अशी मागणी फडणवीस यांनी केली.

या सरकारमध्ये चाललेय तरी काय 

विदर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टी आणि पुराने बाधित शेतकर्‍यांना मदतीची प्रतिक्षा आहे. पण सरकाराने केवळ आश्वासन दिलं, प्रत्यक्षात मदत मिळालेली नाही, वसुली आली की या सरकारचा ‘ससा’ होतो आणि शेतकर्‍यांना मदत म्हटली की, ‘कासव’ होतो अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.

मार्च, एप्रिल, मे 2021 मध्ये अतिवृष्टी झाली तर मदतीचा जीआर 6 ऑक्टोबर 2021 ला, जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली तर मदतीची प्रेसनोट 7 ऑक्टोबर 2021 रोजी. सहा-आठ महिने मदतीचे आदेश जर निघत नसतील, तर प्रत्यक्ष मदत केव्हा पोहोचणार? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.

वसुली’साठी धावणारे सरकार, शेतकर्‍यांच्या मदतीसाठी का असे धडपडतंय्? विदर्भ आणि मराठवाड्याच्या अतिवृष्टी, पूरग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने आणि भरीव मदत जाहीर झालीच पाहिजे. एकरी 50 हजारांची मागणी करणारे आता हात का आखडता घेताहेत? असा सवालही फडणवीस यांनी उपस्थिक केला.

मदतीचे आकडे तर त्याहून संतापजनक

मार्च ते मे 2021 : संपूर्ण रत्नागिरी जिल्हा 5.10 लाख, सिंधुदुर्ग जिल्हा 24 लाख, परभणी जिल्हा 25 लाख, हिंगोली 14 लाख, नांदेड 20 लाख, उस्मानाबाद 1.74 लाख, यवतमाळ 10 लाख, नागपूर 23 लाख, वर्धा 39 लाख, गोंदिया 26 लाख, चंद्रपूर 35 लाख रुपये फक्त

जुलै 2021च्या मदतीची भरघोस घोषणा : नागपूर विभागातील 6 जिल्हे मिळून फक्त 10 कोटी रूपये आणि संपूर्ण नाशिक विभागातील सर्व 5 जिल्हे मिळून फक्त 1 लाख रूपये! म्हणजे एक जिल्हा फक्त 20 हजार रुपये! शेतकर्‍यांप्रति ‘नक्राश्रू’ ढाळणारे ‘महाविकास’ नेते आता बंद पुकारतील काय अशी टीकाही फडणवीस यांनी केली आहे.