राज्यात कोरोना रुग्णवाढीने चिंता वाढवली, पुन्हा मास्कसक्ती होणार?

कोरोना रूग्णावाढीमुळे सरकार अलर्टवर, मुख्यमंत्र्यांनी बोलावली टास्क फोर्सची बैठक

Updated: Jun 2, 2022, 02:40 PM IST
राज्यात कोरोना रुग्णवाढीने चिंता वाढवली, पुन्हा मास्कसक्ती होणार? title=

Corona Update : कोरोनाबद्दल  (Corona) सावध करणारी बातमी. राज्यात कोरोनाची चौथी लाट (Corona Fourth Wave) येतेय की काय अशी भीती आहे. कारण राज्यात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत दुप्पट वाढ झाली आहे.  गेले अनेक दिवस हजाराच्या आत असलेली रुग्णसंख्येने हजाराचा टप्पा पार केला आहे.

राज्यात काल कोरोनाच्या 1081 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक रुग्णसंख्या मुंबईत आढळली आहे. तर मुंबईत 739 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईत शंभरच्या आसपास रुग्णसंख्या होती तिची आता हजाराकडे वाटचाल सुरू झालीय. त्यामुळे पुन्हा मास्कची सक्ती होण्याचीही शक्यता आहे. 

मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल
राज्यात कोरोना रूग्णसंख्या वाढत असताना मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतलीय. आज संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Udahv Thackray) टास्कफोर्सची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री आज कोरोना संदर्भात टास्कफोर्ससोबत चर्चा करणार आहेत. संध्याकाळी वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री आणि टास्कफोर्स यांची बैठक होत आहे. राज्यात पुन्हा मास्क सक्ती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

मास्कसक्ती होणार?
दरम्यान, वाढत्या रुग्णसंख्येबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी गंभीर इशारा दिला आहे. कोरोना  रुग्णसंख्या वाढली तर निर्बंधाबाबत विचार करावा लागेल, असं अजितदादा म्हणाले.  नागरिकांनी काळजी घ्यावी आणि मास्कचा वापर करावा, असं आवाहनही त्यांनी यावेळी नागरिकांना केलं. 

देशातही कोरोना रुग्णवाढ
देशातही कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ  होत आहे. देशात गेल्या 24 तासांत 3 हजार 712 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 5 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. सध्या देशात 19 हजार 509 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.