उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय; आरे आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचे आदेश

मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे येथील मेट्रो कारशेडचे काम थांबवण्याचे आदेश दिले होते.

Updated: Dec 1, 2019, 09:59 PM IST
उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय; आरे आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचे आदेश title=

मुंबई: आरे परिसरातील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी आरे मेट्रो कारशेड विरोधी आंदोलनात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. आरेमधील वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाने ४ ऑक्टोबर रोजी फेटाळून लावल्या होत्या. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करत ४ ऑक्टोबरला रात्रीपासून झाडे तोडायला सुरुवात झाली होती. हे वृत्त समजल्यानंतर अनेक आंदोलक आरेमध्ये येऊन धडकले होते. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले होते. यापैकी २९ आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले होते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी हे गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. 

यापूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे येथील मेट्रो कारशेडचे काम थांबवण्याचे आदेश दिले होते. विकास आणि पर्यावरण हे दोन्हीही सोबत असले पाहिजे. त्यामुळे अंतिम तोडगा निघाल्याशिवाय आरेतील एक पानही तोडणार नसल्याचे उद्धव यांनी स्पष्ट केले होते. तसेच ही स्थगिती केवळ कारशेडच्या कामाला आहे, उर्वरित प्रकल्पाला नव्हे, असेही उद्धव यांनी स्पष्ट केले होते. 

तत्पूर्वी उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळातील पत्रकार कक्षातील अनौपचारिक गप्पांदरम्यान राज्याची नेमकी आर्थिक परिस्थिती जाणून घेण्यासाठी श्वेतपत्रिका काढणार असल्याचेही सांगितले. मी सध्या राज्यात सुरु असलेल्या विकासकामांबाबत माहिती मागवली आहे. हे प्रकल्प कधी सुरु झाले आणि कधी पूर्ण होणार तसेच सध्या त्यांची परिस्थिती काय आहे, हे मला जाणून घ्यायचे आहे. जेणेकरून विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवता येईल. यामध्ये बुलेट ट्रेनसारख्या प्रकल्पांचाही आढावा घेण्यात येईल. मात्र, केवळ आकसापोटी कोणताही प्रकल्प रद्द करणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.