मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी केंद्राकडून मान्य, 'याला' आणखी मिळणार गती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी केंद्राकडून मान्य करण्यात आल्याने मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत.  

Updated: Mar 24, 2021, 06:47 AM IST
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी केंद्राकडून मान्य, 'याला' आणखी मिळणार गती  title=
संग्रहित छाया

मुंबई : कोविड प्रतिबंधात्मक लस (corona vaccination) ४५ वर्षांवरील सर्वांना देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मागणी केंद्राकडून (central government) मान्य करण्यात आल्याने मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत. देशातील ४५ वर्षांवरील वयोगटातील नागरिकांना कोविड (Coronavirus) प्रतिबंधक लस (vaccination) देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्य केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेतच्या नुकत्याच झालेल्या व्हीसीद्वारे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी ही मागणी केली होती. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला.

कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता, सर्वत्र लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी वयोगटाची अट शिथिल करणे गरजेचे आहे. विशेषतः 45 वर्षांवरील तरूण वर्ग कामासाठी बाहेर असतो, त्याला प्रतिबंधात्मक लस मिळणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी व्हिसीमध्ये सांगितले होते. ही मागणी मान्य झाल्याने आता राज्यातील लसीकरणाला आणखी गती मिळणार आहे.

सुरुवातीच्या टप्प्यातही महाराष्ट्र लसीकरणात देशात अव्वलस्थानी होते. आतापर्यंत (2 मार्चच्या आकडेवारीनुसार) राज्यात 45 लाख 91 हजार 401 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

1 एप्रिलपासून देशभरातील 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना लस घेता येणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी तशी घोषणा केली आहे. आता नागरिकांना लस घेण्यासाठी नोंदणी करावी लागेल. आतापर्यंत कोविड योद्धे, फ्रंटलाईन वर्कर्स, 45 वर्षांवरील सहव्याधी असणारे रुग्ण आणि 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस देण्यात येत होती. मात्र आता यात बदल करण्यात आले असून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. 

देशात आतापर्यंत 4 कोटी 85 लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे. आपल्याकडे मुबलक प्रमाणात लस उपलब्ध आहे, अशी माहितीही केंद्रीय सूचना आणि माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. याशिवाय दोन्ही लस सुरक्षित असल्याचंही जावडेकर म्हणाले आहेत. त्यामुळे मान्यता मिळालेल्या नागरिकांनी लवकरात लवकर नोंदणी करून लस घ्यावी, असं आवाहनही केंद्र सरकारतर्फे करण्यात आला आहे.