'आपत्तीच्या काळात संपर्क, संवाद ठेवून हानी टाळा' मुख्यमंत्र्यांचे राज्यातील यंत्रणांना निर्देश

पावसाळ्यातील दुर्घटना टाळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रशासनाला सूचना  

Updated: Jul 1, 2022, 09:15 PM IST
'आपत्तीच्या काळात संपर्क, संवाद ठेवून हानी टाळा' मुख्यमंत्र्यांचे राज्यातील यंत्रणांना निर्देश  title=

Maharashtra Shinde Government : सर्व यंत्रणांनी आपापसात योग्य समन्वय ठेऊन कोणत्याही परिस्थितीत आपत्तींमध्ये जीवितहानी होणार नाही हे बघावं,  त्याचप्रमाणे अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर उतरून काम करावं म्हणजे यंत्रणेतील सर्व लोक देखील सतर्क राहतील अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयातील समिती सभागृहात राज्यातील आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेणारी बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.  

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, आपत्तीमध्ये समन्वय अतिशय महत्त्वाचा आहे. एनडीआरएफने त्याचप्रमाणे लष्कराने देखील गेल्यावर्षी पुराच्या परिस्थितीत चांगलं काम केलं आहे.  कोणत्याही परिस्थितीत संपर्क आणि संवादाचा अभाव राहणार नाही याची दक्षता घ्यावी.  जिल्हाधिकारी आणि पालिका कार्यालयांमधील वॉर रुम यंत्रणा सज्ज राहून लोकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करावा, अशा सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. 

गेल्या वर्षी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या.  विशेषत: नेहमी दरड कोसळणाऱ्या जागांव्यतिरिक्त नव्या ठिकाणी या दरडी कोसळल्या.  त्यामुळे यंदा देखील अधिक दक्ष राहण्याची गरज आहे धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना मोठ्या पावसाच्या वेळेस तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये हलवून त्या ठिकाणी त्यांना जेवण्याखाण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी पालिकांनी घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

मी आणि उपमुख्यमंत्री 24 तास आपणा सर्वांसाठी उपलब्ध असून आपल्याला गतीमानतेने शेवटच्या घटकांपर्यंत शासनाच्या योजना पोहचविल्या पाहिजेत असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

275 मि.मी. पाऊस एका दिवसात पडूनही महानगरपालिकेने तसेच रेल्वेने सफाई तसेच पाणी तुंबणार नाही यासाठी केलेल्या व्यवस्थेमुळे कोठेही मुंबईकरांना त्रास झाला नाही व वाहतुकही व्यवस्थित सुरळीत राहिली याविषयी मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं.