राज्य सरकारचा मोठा निर्णय, प्रत्येक जिल्ह्यात साकारणार 'पुस्तकांचे गाव'

भिलारच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात ही अभिनव संकल्पना राबवली जाणार आहे

Updated: Dec 15, 2021, 08:22 PM IST
राज्य सरकारचा मोठा निर्णय, प्रत्येक जिल्ह्यात साकारणार 'पुस्तकांचे गाव' title=
संग्रहित छाया

मुंबई : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 'पुस्तकांचे गाव' साकारण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

भिलारच्या धर्तीवर पुस्तकाचे गाव ही योजना राज्य मराठी विकास संस्थेच्या स्तरावर स्वतंत्रपणे उपक्रम म्हणून राबविण्यात येईल. प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाचे गाव व्हावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार आजच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या चर्चेनुसार पुस्तकांचे गाव ही योजना विस्तारीत स्वरूपात सुरु करताना पहिल्या टप्प्यात सहा महसुली विभागात आणि नंतर दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाचे गाव सुरु करण्यात येणार आहे.  

पुस्तकाचे गाव हा उपक्रम सुरु करतांना पर्यटनस्थळ, तीर्थक्षेत्र असलेले, वाड:मयीन चळवळ, साहित्यिक वैशिष्ट्य असलेले गाव, केंद्र, राज्य संरक्षित स्मारक, कृषी पर्यटनाचे केंद्र असलेले, पुस्तकाचा खप अधिक असलेले गाव निवडले जाईल. 

यामध्ये संत गाडगेबाबा पारितोषिक प्राप्त गावे, आदर्श गाव, तंटामुक्त, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता यासारख्या शासनाच्या अभियानात योजनेत पात्र ठरलेली पुरस्कार प्राप्त केलेली गावेही निवडता येतील. असे करतांना गावातील लोकांचा सहभाग आणि इच्छाशक्ती ही लक्षात घेतली जाईल. 

यासाठी मराठी भाषा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात येणार आहे. या योजनेसाठी वार्षिक 19 कोटी 79 लाख रुपये इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

राज्यातलं पहिलं पुस्तकांचं गाव
पाचगणी ते महाबळेश्वर रस्त्यावरील पाचगणीपासून सुमारे 5 कि.मी. अंतरावर असलेल्या भिलार गावात पहिल्यांदा ही अभिनव संकल्पा राबवण्यात आली. इथे या, पुस्तके हाताळा, चाळा, वाचा आणि तेदेखील अगदी मोफत. इथे थोडी थोडकी नव्हे तर जवळ जवळ 12000 ते 15000 पुस्तके आहेत. या पुस्तकांची व्यवस्था साहित्यप्रकारानुसार गावातील वेगवेगळ्या 22 ठिकाणी केली आहे.