Mumbai News : कोस्टल रोडवरून प्रवास करण्याआधीच टोलचा भुर्दंड; लोकार्पणाआधीच मोठा निर्णय?

Mumbai Coastal Road : उदघाटनापूर्वीच चर्चा कोस्टल रोडच्या टोलची. टोल घेणार नाही असं म्हटलं गेल्यानंतर अचानक पालिका का करतेय टोलवसुलीची तयारी? 

सायली पाटील | Updated: Dec 14, 2023, 11:39 AM IST
Mumbai News : कोस्टल रोडवरून प्रवास करण्याआधीच टोलचा भुर्दंड; लोकार्पणाआधीच मोठा निर्णय? title=
bmc may impose toll on Mumbai Coastal road latest update news

Mumbai Coastal Road : नव्या वर्षामध्ये आगामी निवडणुकांच्या (Loksabha Election) धर्तीवर अनेक नव्या प्रकल्पांची घोषणा आणि लोकार्पणं दृष्टीक्षेपात आहेत. त्यापैकीच एक म्हणजे बहुप्रतिक्षित कोस्टल रोड. 2024 च्या फेब्रुवारी महिन्यापासून कोस्टल रोडचं लोकार्पण होणार असून, तत्पूर्वी या रस्त्यानं प्रवास करण्यासाठी मुंबई महानगरपालिका टोल वसुलीची तयारी करत असल्याचं वृत्त समोर आललं आहे. 

जवळपास 12700 कोटी रुपयांच्या खर्चानं उभारण्यात आलेल्या या मार्गावरून प्रवास करण्यासाठी टोल आकारला जाण्याचं समर्थन काहींनी केलं आहे. तर, काहींनी टोलवसुली ही गरज असल्याची बाब अधोरेखित केली तर, काहींनी सुरुवातीला हा रस्ता टोलमुक्त असेल असंही जाहीर करण्यात आल्याचा मुद्दा प्रकाशात आणत टोलवसुलीवरून नकारात्मक सूर आळवला आहे. 

हेसुद्धा वाचा : मुंबईकरांना श्वास घेणंही कठीण; 'या' परिसरातील हवा अतिशय वाईट, तुम्ही इथंच राहताय का? 

एका प्रतिष्ठीत माध्यमसमूहानं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, बुधवारी पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं जवळपास 82 टक्के काम पूर्ण झालं असून, दक्षिण मुंबईकडील भाग अर्थात कोस्टल रोडचा वरळीपर्यंतचा पहिला टप्पा फेब्रुवारी महिन्यात प्रवासासाठी सुरु होईल. दरम्यान, कोस्टल रोडच्या दोन्ही मार्गिका लोकार्पण होण्यासाठी मात्र मे महिना उजाडणार असल्याची माहितीसुद्धा पालिकेकडून देण्यात आली आहे. या प्रकल्पाचा दुसरा टप्पा वांद्र्यापर्यंत असून, या टप्प्यावरील बांधकाम अद्याप सुरु झालेलं नाही. मासेमारांच्या विनंतीला विचारात घेत असल्यामुळं ही दिरंगाई होत असल्याचं कारण समोर येत आहे. 

टोलचा पैसा... 

टोलच्या मुद्द्यावरून प्रश्न विचारला असता, टोलवसुलीची शक्यता टाळता येणार नाही, असं स्पष्टीकरण देत पालिकेच्या वतीनं काही महत्त्वाच्या गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला. 'टोल वसुलीची शक्यता नाकारता येत नाही. या माध्यमातून मिळालेल्या रकमेचा वापर भविष्यातील काही प्रकल्प किंवा कोस्टल रोडच्या पुढील टप्प्याच्या खर्चात वापरली जाऊ शकते. पण ही टोलवसुली सरकारच्या संमतीनंतरच व्हावी', असा सूर पालिका प्रशासनाच्या वतीनं आळवण्यात आला.