'पवारांकडून हिंदुंच्या श्रद्धेचा अपमान, हिंदुत्ववादी ठाकरे गप्प का?'

हिंदुत्ववादी उद्धव ठाकरे यावर गप्प का ? 

Updated: Jul 20, 2020, 04:06 PM IST
'पवारांकडून हिंदुंच्या श्रद्धेचा अपमान, हिंदुत्ववादी ठाकरे गप्प का?' title=

मुंबई : राम मंदिर भुमिपुजनाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार असल्याच्या बातमीनंतर देशासह राज्यातील राजकारण पेटलंय. राम मंदिरामुळे कोरोना आटोक्यात येणार का ? असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला. तर हा हिंदुच्या श्रद्धेचा अपमान असून हिंदुत्ववादी उद्धव ठाकरे यावर गप्प का ? असा प्रश्न शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी उपस्थित केलायं. 

दुध दरासाठी भाजपने केलेल्या राज्यव्यापी आंदोलनात शिवसंग्राम देखील रस्त्यावर उतरली आहे. यावेळी मेटे यांनी राज्य सरकारवर टीका केली.

भुमिपुजनाची लगबग

५ ऑगस्टला भुमिपुजन सोहळा असल्याचे काल केंद्राकडून स्पष्ट करण्यात आलं. मंदीर समितीने याचे निमंत्रण निवडक जणांनाच दिल्याचे समोर आलंय. राम मंदीर निर्माणात पुढाकार घेणाऱ्या शिवसेनेला याचे निमंत्रण अद्याप आले नाहीय. दरम्यान शरद पवार यांनी मोदी सरकारकडून राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी सुरु असलेल्या लगबगीवर टीका केली.

काय म्हणाले पवार ?

सध्या देशभरात असलेल्या लॉकडाऊनमुळे मोठ्याप्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. अशावेळी केंद्र सरकारने त्यावर अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र, काही लोकांना वाटतं राम मंदिर बांधून कोरोना जाईल. तेव्हा राम मंदिर बांधून करोना आटोक्यात येत असेल तर भूमिपूजन अवश्य करा, असा टोला शरद पवार यांनी मोदींना लगावला होता.  पवारांच्या या विधानानंतर देशभरातील नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली होती.