Unlock-4 : राज्यातल्या विजेच्या मागणीत दोन हजार मेगावॅटने वाढ, उर्जामंत्र्यांची माहिती

गणेशोत्सव आणि अनलॉक-४ मुळे निर्बंध शिथील झाल्यामुळे राज्यभरात विजेच्या मागणीमध्ये दोन हजार मेगावॅटने वाढ झाली आहे

Updated: Sep 2, 2020, 06:44 PM IST
Unlock-4 : राज्यातल्या विजेच्या मागणीत दोन हजार मेगावॅटने वाढ, उर्जामंत्र्यांची माहिती title=

मुंबई : गणेशोत्सव आणि अनलॉक-४ मुळे निर्बंध शिथील झाल्यामुळे राज्यभरात विजेच्या मागणीमध्ये दोन हजार मेगावॅटने वाढ झाली आहे, अशी माहिती उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. राज्यात पावसाचा वेग कमी झाल्यामुळेही विजेची मागणी वाढल्याचं नितीन राऊत म्हणाले. 

विजेची मागणी वाढल्यामुळे परळी वीज केंद्राचा २५० मेगावॅटचा संच क्रमांक ८ आणि भुसावळ वीज केंद्रातील प्रत्येकी ५०० मेगावॅटचा संच क्रमांक ४ आणि ५ मधून वीज उत्पादन सुरू झालं, असल्याचं नितीन राऊत यांनी सांगितलं. 

राज्यातील वीज ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा देण्यासाठी वीज कंपन्यांनी वीज उत्पादन संच सज्ज ठेवावं, तसंच तांत्रिक यंत्रणा सक्षम ठेवून कुशल मनुष्यबळाचा सुयोग्य वापर करावा, असे निर्देश तिन्ही वीज कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना नितीन राऊत यांनी दिले आहेत. राज्यातील पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या भागातील वीज यंत्रणा पूर्ववत करण्याचे खडतर आव्हान महावितरणसमोर असून युद्धस्तरावर कामे हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.   

केंद्र शासनाने अनलॉक-४ बाबत नवीन नियमावली जारी केल्यानंतर राज्य शासनाने 'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला असल्याने, आता बऱ्यापैकी शासकीय, निमशासकीय कार्यालये सुरु झाली आहेत. हॉटेल्स, रेस्टॉरंटला परवानगी देण्यात आली आहे. दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने यांच्या वेळा वाढवून दिल्या आहेत, उद्योगांची चाके देखील वेग घेत आहेत. 'कोविड-१९' आणि लॉकडाऊनमुळे संपूर्ण समाजजीवनाची मंदावलेली गती आता हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली असल्याने विजेच्या मागणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.