पोलीस भरतीत बेरोजगारीचे भीषण वास्तव, शिपाई भरतीसाठी डॉक्टर, इंजिनिअर, वकिलांची गर्दी

संभाजीनगरात पोलीस शिपाई भरतीसाठी उच्च शिक्षित विद्यार्थ्यांची गर्दी, 39 पदांसाठी तब्बल पाच हजार उमेदवार

Updated: Jan 5, 2023, 08:20 PM IST
पोलीस भरतीत बेरोजगारीचे भीषण वास्तव, शिपाई भरतीसाठी डॉक्टर, इंजिनिअर, वकिलांची गर्दी title=

विशाल करोळे, झी मीडिया, संभाजीनगर :  संभाजीनगरमध्ये (Sambhaji Nagar) सध्या पोलीस शिपाई भरती (Police Constable Recruitment) सुरू आहे.  तब्बल 4 वर्षांनी ही भरती होत असल्याने तरुणांची मोठी गर्दी झाली आहे. विशेष म्हणजे 39 जागांसाठी तब्बल 5 हजार पेक्षा जास्त अर्ज आले आहेत आणि यातही कहर म्हणजे या बेरोजगारांच्या (Unemployed) गर्दीत पोलीस शिपाई होण्यासाठी डॉक्टर (Doctor), इंजिनीअर (Engineer), अगदी एमबीए (MBA) झालेले तरुणही आहेत. यावरून बेरोजगारीचं भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आलंय. 

कुटुंबियांना हवीय सरकारी नोकरी
महाराष्ट्राच्या विविध भागातून हजारो तरुण पोलीस भरतीसाठी संभाजीनगरमध्ये आले आहेत. नांदेडचा आदित्य फाळके इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधून (Electrical Engineering) बीटेक करतोय, तर औरंगाबादचा शुभम चव्हाण मॅकेनिकल इंजिनिअर (Mechanical Engineer) आहे. दुर्गेश छानवाला हा तरुण एका मोठ्या खासगी कॉलेजमधून एमबीए करतोय. पण या सर्व तरुणांच्या कुटुंबियांना सरकारी नोकरी हवीय. नोकरीत स्थिरता हवी या उद्देशाने हे सर्व तरुण कुटुंबियांच्या आग्रहास्तव पोलीस शिपाई भरतीसाठी आले आहेत. 

ही झाली प्रातिनिधिक उदाहरण, पोलिसांनी उच्च शिक्षित तरुणांचा एक डेटा तयार केला असून तो पाहून तर यांनाही शिपाई बनायचे आहे का असा प्रश्न पडतोय.

ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट झालेल्या विद्यार्थ्यांचाही भडीमार आहे आणि या सगळ्यांना शिपाई व्हायचं आहे. पोलीस भरती सुरू झाली मात्र यावेळेस इतके उच्चशिक्षित उमेदवार पाहून अधिकाऱ्यांनाही धक्का बसलाय,  हे उच्चशिक्षित उमेदवार जर पोलीस शिपाई बनण्यासाठी येताय तर आम्हालाही चांगले कर्मचारी मिळतील असं औरंगाबादच्या पोलीस अधीक्षकांचं म्हणणं आहे. 

पोलीस भरतीसाठी उच्चशिक्षित उमेदवारांची असलेली ही गर्दी विचार करायला लावणारी आहे. सरकारी नोकरीत असणारे स्थैर्य आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या मुलांना सरकारी नोकरी असली तर मुलगी चांगली मिळते आणि घरच्यांची सरकारी नोकर व्हावं ही इच्छा यामुळे हे सर्व तरुण इथं आले आहेत. मग यांनी घेतलेल्या उच्च शिक्षणाचा फायदा तो काय कदाचित बेरोजगारीचे हे भीषण वास्तव तर नाही ना असा प्रश्न या निमित्ताने पडतोय.