पाण्याची बाटली जिवावर बेतली, घेतला तिघांचा जीव, नक्की काय झालं?

 पाण्याची एक बाटली (water bottle) तुमचा जीव धोक्यात घालू शकते.   

Updated: Aug 20, 2021, 07:49 PM IST
पाण्याची बाटली जिवावर बेतली, घेतला तिघांचा जीव, नक्की काय झालं? title=

श्रीकांत राऊत झी 24 तास यवतमाळ : ही बातमी प्रत्येक वाहनधारकासाठी आहे. पाण्याची एक बाटली तुमचा जीव धोक्यात घालू शकते. कदाचित तुमचा यावर विश्वास बसणार नाही, पण हे अगदी खरंय. ही बाटली तुमच्या जीवावर कशी उठू शकते हेच दाखवणारा झी 24 तासचा हा रिपोर्ट. यवतमाळमध्ये ही पाण्याची बाटली जिवावर बेतली आहे. चारचाकी वाहन घेऊन जाताना आपण हमखास पाण्याची बाटली गाडीत ठेवतो. पण हीच बाटली तुमच्या मृत्यूला कारणीभूत ठरू शकते. या बाटलीनं तीन निष्पाप जीवांचा बळी घेतलाय. (Three killed in Yavatmal after water bottle got stuck in clutch and brake)  

नक्की काय झालं? 

यवतमाळच्या पुसद तालुक्यातील खंडाळा घाटात एका भरधाव तवेरा गाडीला भीषण अपघात झाला. त्यात तीन जणांना आपला जीव गमवावा लागलाय. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताला निमित्त ठरलीय पाण्याची एक बाटली...मध्य प्रदेशातील हरदा आणि खंडवा जिल्ह्यातले काहीजण मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमासाठी पुसदला आले. परतीच्या प्रवासात गाडीतली पाण्याची बाटली क्लच आणि ब्रेकमध्ये अडकली आणि तिथेच घात झाला. चालकाचं नियंत्रण सुटलं आणि गाडी एका झाडावर आदळली. 

यावरून तुम्हाला कल्पना येईल की एक छोटीशी चूकही किती महागात पडून शकते. त्यामुळे गाडी चालवताना क्लच, ब्रेक किंवा सीटजवळ पाण्याची बाटली तर नाही ना हे तपासून घ्या..नाही तर हीच बाटली तुम्हाला पाणी पिण्याचीही संधी देणार नाही.