राज्यातील 'या' दोन शेतकरी नेत्यांनी महायुतीला तारलं, शिंदे गटाच्या दोन उमेदवारांना झाला फायदा

Maharashtra Loksabha Nivadnuk Nikal: महाराष्ट्रात अनपेक्षित असा निकाल लागला आहे. अनेक दिग्गजांचा पराभव झाला आहे. भाजपलादेखील अपेक्षित यश मिळालेलं नाहीये.   

Updated: Jun 5, 2024, 01:50 PM IST
राज्यातील 'या' दोन शेतकरी नेत्यांनी महायुतीला तारलं, शिंदे गटाच्या दोन उमेदवारांना झाला फायदा title=
These 2 Farmer Leader Ravikant Tupkar and Raju Shetty indirectly Helps Mahayuti To Win in Maharashtra Lok Sabha

Maharashtra Loksabha Nivadnuk Nikal: देशात एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत भाजपला मात्र अपेक्षित मत मिळालेलं नाहीये. तसंच, राज्यातही महायुतीला मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या नाराजीचा काही प्रमाणात फटका बसला आहे. मात्र, असे असलं तरी दोन शेतकरी नेत्यांच्या उमेदवारीचा फायदा शिवसेना शिंदे गटाला झाला असून महाविकास आघाडीला तोटा झाला आहे. 

महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपला मोठा फटका बसला आहे. राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघापैकी काही मतदारसंघात धक्कादायक निकाल लागले आहेत. अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोर जावे लागले आहेत. राज्यात भाजपला 9 जागा, शिवसेनेला 7 जागा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1 जागा मिळाली आहे. म्हणजेच महायुतीला एकूण 17 जागा मिळाल्या आहेत. दोन शेतकरी नेत्यांच्या उमेदवारीचा फायदा शिवसेनेना शिंदे गटाला झाला आहे. 

हातकणंगलेमध्ये शिवसेनचे धैर्यशिल माने यांनी ठाकरे गटाचे सत्यजित पाटील यांचा केवळ १३४२६ मतांनी पराभव केला. या ठिकाणी राजू शेट्टी तिसऱ्या नंबरवर गेले असले तरी त्यांना १ लाख ७९ हजार ८५० मते मिळाली. दुसरीकडे बुलढाणा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे प्रतापराव जाधव विजयी ठरले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार प्रतापराव जाधव केवळ २९ हजार ४७९ मतांनी विजयी झाले. तर, त्यांच्या विरोधात असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांना 318862 मते मिळाली आहेत. त्याचबरोबर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना तब्बल अडीच लाख मते मिळाली. तिरंगी लढत असल्याने मतांची विभागणी झाल्याने त्यांचा फटका महाविकास आघाडीला बसला. 

दरम्यान, राजू शेट्टी यांनी पराभवानंतर खंत व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मला लोकसभेत जायचं होतं पण शेतकऱ्यांनी  देखील मला म्हणावी तशी साथ  दिली नाही, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. हातकणंगले  लोकसभा मतदारसंघातून राजू शेट्टी यांचा दारुण पराभव झाल्यानंतर हा पराभव राजू शेट्टी यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. धार्मिक ध्रुवीकरण आणि पंतप्रधान पदाचा मुद्दा या विचारधारेमध्ये अनेक माणसं बळी पडली त्यामुळे असा निकाल आला अस देखील राजू शेट्टी म्हणालेत. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात  पुन्हा एकदा शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांनी आटातटीच्या लढतीत विजय मिळवला. त्यानंतर राजू शेट्टी चांगलेच नाराज झाल्याचे दिसतय.