माथेरानच्या डोंगराखालून निघणार दिल्लीचा बोगदा; मुंबईतून 12 तासात दिल्ली गाठता येणार

या बोगद्यामुळे बदलापूर ते पनवेल हा दीड तासांचा प्रवास फक्त 15 मिनिटांत होणार आहे. बदलापूर ते पनवेल हे जवळपास 38 किमीचे अंतर आहे.

वनिता कांबळे | Updated: Jul 15, 2024, 11:21 PM IST
  माथेरानच्या डोंगराखालून निघणार दिल्लीचा बोगदा; मुंबईतून 12 तासात दिल्ली गाठता येणार title=

JNPT HIGHWAY BADLAPUR TUNNEL : माथेरानच्या डोंगराखालून दिल्लीचा बोगदा निघणार आहे. त्यामुळे मुंबईहून 12 तासांत राजधानी दिल्ली गाठता येणार आहे. जगातील सर्वांत लांब म्हणून ओळखल्या जाणा-या आणि दिल्ली ते उरणच्या जेएनपीटी बंदरास जोडणारा असा हा 1350 किमीच्या मार्ग  आहे. यासाठी माथेरानच्या इको सेन्सेटिव्ह झोनच्या डोंगररांगातून 4.39 किमीचा आठ पदरी बोगदा लवकरच खोदला जाणार आहे.

पनवेलजवळ माथेरानच्या पायथ्याशी मोरबे गावापासून हा बोगदा सुरू होणार असून, तो ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथनजीकच्या भोज गावापर्यंत असेल. पर्यावरण खात्याची परवानगी मिळाल्यानंतर त्याच्या बांधकामाचं कंत्राट नॅशनल हायवे अॅथॉरिटीने इरकॉन कंपनीला दिलंय...बोगद्यांवर 1 हजार 453 कोटींचा खर्च होणार आहे...यामुळे दिल्ली-मुंबई रस्त्याचं अंतर 24 तासांवरून 12 तासांवर येणार असून, हा ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस-वे आठ पदरीचा आहे...त्यावर एक लाख कोटी खर्च करण्यात येणाराय.

वसई ते ठाणे अतिवेगवान प्रवास 

लवकरच वसई ते ठाणे अतिवेगवान प्रवास होणारेय. ठाण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आणि ठाणे, वसई, विरार, मीरा, भाईंदर प्रवास अतिवेगवान करण्यासाठी आता 'एमएमआरडीए'ने भुयारी बोगदा बांधण्याचा निर्णय घेतलाय. वसई, फाऊंट हॉटेल नाका ते गायमुख, ठाणे असा बोगदा बांधण्यात येणारेय. तर फाऊंटन हॉटेल ते भाईंदर असा उन्नत रस्ताही बांधण्यात येणारेय. या दोन्ही प्रकल्पांना जवळपास 20 हजार कोंटींचा खर्च येणारेय. यामुळे घोडबंदर इथल्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल. बोगदा चार मार्गिकांचा असणार असून उन्नत रस्ता 6 मार्गिकेचा असणारेय.

बदलापूर ते पनवेल अंतर अवघ्या 15 मिनीटात पार करता येणार

बदलापूर ते पनवेल अंतर अवघ्या 15 मिनीटात पार करता येणार आहे. जेएनपीटी वडोदरा महामार्गातील बोगद्याचे काम प्रगतीपथावर आहे.   माथेरानच्या पर्वतरांगामधून जाणाऱ्या या बोगद्याचे काम  2025 ला पूर्ण होणार आहे. यामुळे बदलापूर आणि पनवेलकराचा प्रवास सुपरफास्ट होणार आहे.  बदलापूर शहरातून जाणाऱ्या जेएनपीटी वडोदरा या महामार्गात येणाऱ्या बोगद्याचे काम 25 टक्के पूर्ण झाले आहे. मुंबई - वडोदरा - जेएनपीटी बंदराला जोडणारा प्रस्तावित महामार्ग ठाणे जिल्ह्यातल्या अंबरनाथ तालुक्यातून जात आहे. या महामार्गामुळे बदलापूर शहराला भविष्यात बडोदा आणि जेएनपीटीची थेट कनेक्टिव्हीटी मिळणार आहे. यामुळे हा अत्यंत महत्वकांक्षी प्रकल्प मानला जात आहे. बदलापूरहून पनवेल तालुक्यात जाण्यासाठी माथेरानच्या पर्वतरांगातून बोगदा खोदला जात आहे.

हे देखील वाचा... ठाणे ते बोरिवली प्रवास आता फक्त 12 मिनिटांतच; मुंबईत बनतोय भारतातील सर्वात लांब आणि मोठा शहरी भुयारी मार्ग