सातारा जिल्ह्यातील 'या' गावात डोंगराला मोठ्या भेगा पडल्या; ग्रामस्थ भयभित

सातारा जिल्ह्यातील पश्चिम‌ भागात सध्या पावसाची संततधार कायम आहे. या पावसामुळे सातारा तालुक्यातील मोरेवाडी या ठिकाणी डोंगराला भेगा पडुन काही भाग खचला असल्याचं निदर्शनास आल्यानंतर या गावातील लोकांना प्रशासनाने तात्काळ सुरक्षित स्थळी हलवले आहे. तात्पुरत्या स्वरूपात या ठिकाणी शेल्टर तयार करून त्याठिकाणी ग्रामस्थांना राहण्याची विनंती प्रशासनाकडून केली जाते आहे.

Updated: Jul 23, 2023, 08:55 PM IST
सातारा जिल्ह्यातील 'या' गावात डोंगराला मोठ्या भेगा पडल्या; ग्रामस्थ भयभित  title=

Satara News : सातारा जिल्ह्यातील मोरेवाडी इथल्या डोंगराला भेगा पडल्या असून डोंगराचा भागही खचला आहे. त्यामुळे मोरेवाडी गावाला मोठा धोका निर्माण झाला आहे. डोंगर खचल्याची माहिती मिळताच प्रशासनानं तातडीनं गावक-यांना सुरक्षितस्थळी हलवल आहे. डोंगराला भेगा पडल्यानं मोठंमोठी दगडं पुढं सरकली आहेत. त्यामुळे नागरिक भयभीत झालेत. सध्या 23 कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे. प्रशासनं या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. इरसालवाडीसारख्या दुर्घटनेला सामोरं जाण्याआधी कायमचं पुनर्वसन करा, अशी मागणी गावक-यांनी केली आहे.

मोरेवाडी गावावर सध्या भितीचं वातावरण पाहायला मिळतय गावाच्या लगत असणा-या डोंगरालाच मोठ्याला भेगा पडल्यामुळं गावावर हा डोंगर काळ बनुन उभा असल्याचं पाहायला मिळतय डोंगराला भेगा पडल्यामुळं या ठिकाणीचे भले मोठे दगड देखील अनेक फुट पुढे सरकलेत. नेहमी या ठिकाणी येणा-या लोकांनी हे पाहिल्यानंतर गावात भितीचं वातावरण पसरलय. 

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून, पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळीकडं वाटचाल सुरू आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 38 फूट 3 इंचावर पोहचलीय. पंचगंगेची इशारा पातळी ही 39 फूट इतकी आहे. तर धोका पातळी ही 43 फूट इतकी आहे. पंचगंगा नदी कोणत्याही क्षणी इशारा पातळी ओलांडून तिची वाटचाल धोका पातळीकडे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याची सूचना दिल्या आहेत.

कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कोल्हापुरातून कोकणात जाणारा एक मार्ग बंद झालाय. कोल्हापूर सिंधुदुर्ग मार्गावर पाणीच पाणी झालंय. गगनबावड्याजवळ मांडुकली इथे पाणी साचलंय. मांडुकली मार्गावर 3 फूट पाणी साचलंय. दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली

48 तास कुठलाही पाऊस नसताना चंद्रपूर शहरात विचित्र परिस्थिती

चंद्रपूर शहरात गेले 48 तास कुठलाही पाऊस नसताना शहरात विचित्र परिस्थिती उद्भवली. नांदेड-यवतमाळ या जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरात हाहाकार उडालाय. चंद्रपूर शहराच्या नदीकाठच्या ठिकाणी पुराचं पाणी शिरलं असून शेकडो घरातील नागरिकांनी आपली घरं रिकामी केली आहेत. चंद्रपूरच्या सिस्टर कॉलनी, रहमत नगर, उमाटे लेआउट, नगीना बाग या सर्वच भागांमध्ये नागरिक दहशतीत आहेत. सिस्टर कॉलनी परिसरात घरात अडकून पडलेल्या नागरिकांना बोटीच्या सहाय्यानं बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. 

यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टी 

यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टी झालीय. त्यामुळे पुराच्या पाण्यात अडकलेल्या 280 नागरिकांचे सुरक्षित स्थलांतरण करण्यात आले. तर 5317 नागरिकांची निवारागृहात व्यवस्था करण्यात आलीय. यवतमाळमध्ये तुफान पाऊस पडत असून, जिल्ह्यात 110 पैकी 77 मंडळात अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यात 200 मिमी पेक्षा अधिक पाऊस झाल्याने ठिकठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे तालुका आणि जिल्हा बचाव पथके तसेच एसडीआरएफची टीमने नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवलं. आर्णी तालुक्यातील कवठा बाजार येथे अडकून पडलेल्या दाम्पत्याला देखील बोटीद्वारे सुटका करण्यात आलीय.