शिवराज्याभिषेक सोहळा : दीड हजार मावळे निघाले रायगडच्या दिशेने

कोरोनामुळे गेली दोन वर्ष शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. मात्र, यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा ‘शिवराय मनामनात - शिवराज्याभिषेक घराघरांत’ ही संकल्पना घेऊन किल्ले रायगडावर अत्यंत भव्यदिव्य प्रमाणात साजरा होणार आहे.  

Updated: Jun 5, 2022, 09:14 AM IST
शिवराज्याभिषेक सोहळा : दीड हजार मावळे निघाले रायगडच्या दिशेने title=

रायगड : रायगडावर होणार हा भव्य असा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या औत्सुक्याने आणि आदराने जगभर पाहिला जातो. या सोहळ्याचे ऐतिहासिक मूल्य पाहता शिस्तबद्धतेच्या काळजीसह प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक असा हा सोहळा संपन्न होणार आहे. 

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा महोत्सव समितीचे मार्गदर्शक संभाजीराजे छत्रपती यांच्या सूचनेनुसार या सोहळ्याची तयारी करण्यात येत आहे.

आकर्षक विद्युत रोषणाईने रायगड उजळून निघणार आहे. गडावर पाच ते सहा लाख शिवभक्तांचे अन्नछत्र उभारण्यासह राजसदर फुलांनी सजविण्यात आले आहे. भवानी पेठ, बाजारपेठ, जगदीश्वर मंदिर आणि शिवसमाधी विद्युत रोषणाईने उजळून निघणार आहे.

गडावर जाण्यासाठी आणि उतरण्यासाठी एकेरी मार्ग करण्यात येणार आहे. रोप वे साठी दिव्यांग आणि वृद्धांना प्राधान्य देण्यात आले आहे. तर शिवभक्तांना गडावर पायी येण्याचे आवाहन अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा महोत्सव समितीने केले आहे.

गडावरील तलावांच्या स्वच्छतेमुळे मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध आहे. शिवप्रेमींच्या राहण्यासाठी तात्पुरते तंबू उभारणे व गड स्वछतेसाठी एक हजार स्वयंसेवक कार्यरत असून रायगडावरील प्रत्येक ऐतिहासिक क्षण टिपून तो जगभर पोहोचवण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा महोत्सव समितीने दिली आहे.

दरम्यान, रायगडावर होणाऱ्या या भव्य शिवराज्याभिषेक सोहळ्याचे साक्षीदार होता यावे यासाठी चाळीसगावातील दीड हजार तरुण शिवरायांचा जयघोष करत रायगडाच्या दिशेने निघाले आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या 29 बसेसमधून जय शिवराय असा घोषणा देत या मावळ्यांनी रायगडाच्या दिशेने कूच केले आहे.

भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून ही रायगडवारी तरूणांना घडवून आणण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी नितीमुल्य घडवली ती तरुणांना माहीत व्हावी यासाठी या रायगडवारीचे आयोजन करण्यात आले अशी माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली.

असा होणार सोहळा

5 जून रोजी युवराज संभाजीराजे आणि शहाजीराजे पायी गड चढणार असून होळीच्या माळावर शिवकालीन युद्धकलेचे सादरीकरण होणार आहे. रायगड प्राधिकरणाच्या आत्तापर्यंतच्या कार्याचे सादरीकरण, जागर शाहिरांचा, स्वराज्याच्या इतिहासाचा हा कार्यक्रम होईल.

तर मुख्य दिवशी 6 जून रोजी सकाळी ध्वजपूजनाने कार्यक्रमाची सुरुवात होईल. युवराज संभाजीराजे आणि शहाजीराजे यांच्या हस्ते दरबार पुरोहितांच्या मंत्रघोषात शिवरायांच्या मूर्तीवर सुवर्णमुद्रांचा अभिषेक होईल. शिवरायांच्या पालखीची नगर प्रदक्षिणा कार्यक्रमाने सांगता होईल.