'ज्याने सख्ख्या चुलत्याचा विश्वासघात...'; 105 कोटींचा उल्लेख करत शालिनीताईंची अजित पवारांवर टीका

Shalinitai Patil Slams Ajit Pawar: शालिनीताई पाटील यांनी अजित पवारांवर कठोर शब्दांमध्ये टीका करताना स्वत:च्या चुलत्याचा विश्वासघात करणाऱ्या व्यक्तीवर कोण विश्वास ठेवणार? असा सवाल उपस्थित केला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 25, 2023, 12:56 PM IST
'ज्याने सख्ख्या चुलत्याचा विश्वासघात...'; 105 कोटींचा उल्लेख करत शालिनीताईंची अजित पवारांवर टीका title=
शालिनीताईंनी व्यक्त केला संताप

Shalinitai Patil Slams Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सरकारमध्ये सहभागी झालेल्या गटाचं नेतृत्व करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी बारामतीमध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा थेट उल्लेख न करता पवारांच्या बंडाबद्दल भाष्य केलं होतं. अजित पवारांच्या या विधानाचा आता शालिनीताई पाटील यांनी समाचार घेतला आहे. शरद पवार आणि अजित पवार यांचं बंड फार वेगळं असल्याचं सांगताना शालिनीताईंनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्या बंडामध्ये जमीन आस्मानाचं अंतर असून शरद पवारांचे बंड पक्षातील आमदार दुसरीकडे जाऊ नये म्हणून होते. तर दुसरीकडे अजित पवारांचे बंड स्वार्थासाठी होतं. उपमुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी अजित पवारांनी बंड केले, अशी टीका शालिनीताई पाटील यांनी केली आहे.

आमदार पुन्हा परत येईल

शालिनीताई पाटील यांनी 2024 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भविष्यवाणी करताना, "2024 मध्ये पुन्हा देवेंद्र फडणवीस सत्तेत येतील. तुम्हाला लहानाचं मोठं केलं त्या सख्ख्या चुलत्याचा विश्वासघात ज्या माणसाने केला त्याच्यावर विश्वास का ठेवावा?" असा सवाल उपस्थित केला. "अजित पवारांवर कुणीही विश्वास ठेवणार नाही. त्यांच्याबरोबर गेलेली माणसं कोणत्या लायकीची आहेत हे मी आधीच सांगितलं आहे. त्यात बाकी जे आमदार आहेत ते पुन्हा शरद पवारांकडे जातील," असंही शालिनीताई म्हणाल्या आहेत.

अवस्था फार वाईट होईल

अजित पवारांची राजकीय अवस्था फार वाईट होईल असंही शालिनीताई म्हणाल्यात. "सर्व आमदार पवारांकडे परत आल्यानंतर त्यांची दुर्दशा होईल. तुरुंगात आजीवन कारावास भोगून आलेल्या व्यक्तीसोबत जे होते. त्याला निवडणूक लढवता येत नाही. तसे होईल. 105 कोटींचा भ्रष्टाचार केलेला हा माणूस आहे," असं शालिनीताई म्हणाल्या.

5 कोटींसाठी मुख्यमंत्र्यांची वाट लावली

शालिनीताईंनी पुढे बोलताना अजित पवारांची अवस्था अंतुलेसारखी होईल असंही म्हटलं आहे. "इंदिरा गांधींसमोर अंतुलेचा काय थरथराट झाला होता, हे मला माहिती आहे. मुख्यमंत्री असताना स्वत:च्या नावावर ट्रस्ट उभा केला. वैयक्तिक स्तरावर 5 कोटींचा फायदा घेतला. मी इंदिरा गांधींना ही हकीकत सविस्तरपणे सांगितल्यानंतर अंतुलेंना पायउतार होण्याचे आदेश दिले. त्यानंतर कोर्टात अंतुलेविरोधात खटला उभा झाला. मी हे सर्व केले आहे. 5 कोटींसाठी एका मुख्यमंत्र्यांची वाट लावली आहे. हा तर 105 कोटींचा भ्रष्टाचार आहे. सिंचनातील हा घोटाळा आहे," असं सूचक विधान शालिनीताई पाटील यांनी केलं आहे.

मी यशवंतरावांविरोधात लढले

"मी सातारा मतदारसंघातून यशवंतराव चव्हाण यांच्याविरोधात निवडणुकीला उभी राहिलेली आहे. त्यावेळी ते उप-पंतप्रधान होते. त्यांच्यासमोर उभे राहायला कुणी तयार नव्हते. आम्ही काँग्रेसमध्ये होतो. ते काँग्रेससोडून बाहेरून लढत होते. त्यांच्याविरोधात उभे राहण्याचा माझ्या पक्षाने आदेश दिला," असं शालिनीताईंनी सांगितलं. तसेच पुढे बोलताना कोणी साताऱ्यातून उभं राहण्यास तयार नव्हतं असंही शालिनाताईंनी आठवण सांगताना नमूद केलं.

कोणीच अर्ज केला नाही

"सातारा जिल्ह्यात त्यांच्याविरोधात कोणीच अर्ज केला नाही. वसंतदादांना पक्षाने उभे राहण्यास सांगितले. मात्र त्यांनी मी सांगलीतून उभा राहतोय असं सांगत तुम्ही शालिनीताईंना विचारा असा सल्ला दिला. ज्यांचे माहेर सातारा आहे. माहेरची लोक त्यांना प्रेम करतात. पक्षाने शालिनीताईंना उमेदवारी द्यावी अशी शिफारस त्यांनी केली. त्यानंतर पक्षाने मला उमेदवारी दिली. आम्ही समोरासमोर निवडणूक लढवली. कुणाविरोधात कारस्थान केले नाही. हा माझा आणि माझ्या पतीचा स्वभाव नाही," असं शालिनीताईंनी म्हटलं.