सामूहिक हिंसा आणि आरएसएसचा काहीही संबंध नाही - मोहन भागवत

विजयादशमीच्या मोहन भागवतांनी झुंडबळीच्या घटनांचा मुद्दा आपल्या भाषणात उचलून धरला

Updated: Oct 8, 2019, 10:51 AM IST
सामूहिक हिंसा आणि आरएसएसचा काहीही संबंध नाही - मोहन भागवत  title=

नागपूर : विजयादशमी आणि 'आरएसएस'च्या स्थापना दिनानिमित्तानं सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूरमध्ये संघाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी, जमावाकडून हत्येच्या घटना (मॉब लिचिंग) आणि आरएसएसचा काहीही संबंध नसल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं. सामूहिक हिंसा आणि मॉब लिंचिंगच्या घटनांना जोडून त्यांना सांप्रदायिकतेचा रंग दिला गेला. हा संघाविरुद्ध रचण्यात आलेला कट आहे. खरं म्हणजे, अशा हिंसक घटना रोखण्यासाठी संघानं नेहमीच प्रयत्न केलेत. लिंचिंग सारखे शब्द कधीच भारतीय संस्कृतीचा भाग नव्हते. मॉब लिंचिंगच्या नावावर भारताला बदनाम करण्याचा कट रचला जातोय. संघाचे कार्यकर्ते नेहमीच सामूहिक हिंसेला रोखण्याचा प्रयत्न करतात.

फक्त एकाच समुदायाकडून अशा घटना घडत नाहीत, उलट प्रकारही घडतात. काही वेळा चिथावणी दिल्यामुळे झुंडबळीसारख्या घटना घडतात. समाजातील काही लोकांनी केलेल्या कृत्यासाठी संपूर्ण समाजाला जबाबदार धरलं जातं. झुंडबळीच्या घटनांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जबाबदार धरले जातं, असं म्हणत त्यांनी झुंडबळीच्या घटनांचा मुद्दा आपल्या भाषणात उचलून धरला. 

सामूहिक हिंसा घडवू आणणारे लहान-मोठे गट समाजात वावरत आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असं म्हणत 'कोणी कितीही चिथावले तरी मर्यादा सोडू नका', असा सल्ला मोहन भागवतांचा स्वयंसेवकांना दिला. 

इतकी विविधता असलेले समुदाय शांततेने भारतात नांदतात, जगात असा दुसरा कोणताही देश नाही. कायद्याच्या नियमांचे पालन सक्तीने झाले पाहिजे, ही राजाची जबाबदारी आहे. झुंडबळीसारख्या घटनांमधील दोषांनी कडक शासन करा, असं म्हणत मोहन भागवत त्यांनी भाजपा सरकारचेही कान टोचलेत.