३४ हजार कोटींच्या कर्जमाफीची आकडेवारी संशयास्पद - राजू शेट्टी

राज्य सरकारने जाहीर केलेल्या ३४ हजार कोटींच्या कर्जमाफीतील आकडेवारी संशयास्पद आहे, असा थेट आरोप स्वाभिमानी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केलाय.

Updated: Jun 24, 2017, 11:31 PM IST
३४ हजार कोटींच्या कर्जमाफीची आकडेवारी संशयास्पद - राजू शेट्टी  title=

कोल्हापूर : राज्य सरकारने जाहीर केलेल्या ३४ हजार कोटींच्या कर्जमाफीतील आकडेवारी संशयास्पद आहे, असा थेट आरोप स्वाभिमानी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केलाय.

जाहीर केलेल्या आकडेवारीबाबत सरकारने कोणताही संपूर्ण खुलासा केलेला नाही, मागील आघाडी सरकारने देशातील शेतकर्यांची सरसकट कर्जमाफी ५२ हजार कोटी रूपयांची केली होती.  ही माहिती देशाच्या सभागृहात अर्थमंत्री अरूण जेटली यांनी मी लोकसभेच्या सभागृहात विचारलेल्या प्रश्नांला उत्तर दिलं आहे, अशी माहिती शेट्टी यांनी दिली. 

जर कोणतेही निकष न लावता संपूर्ण देशातील  कर्जमाफी ५२ हजार कोटींची असेल तर राज्याने जाहीर केलेली ३४ हजार कोटींची आकडेवारी संशयास्पद आहे. यामुळे शासनाने जी ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली आहे, या आकडेवारीची सविस्तर माहिती देऊन यामध्ये सरसकट माफ झालेली शेतकऱ्याची संख्या व आकडेवारी, ज्यांना दीड लाखापर्यंत कर्ज माफी मिळालेली आहे, अशा शेतकऱ्यांची संख्या व आकडेवारी व २५ हजार कमाल व किमान नियमित  कर्जदार असणाऱ्या शेतकऱ्यांची आकडेवारी जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

 या कर्जमाफीत शासनाने जे निकष घातलेले आहेत त्यात अनेक शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकत नाही. मग ही एवढी ३४ हजार कोटींची आकडेवारी आली कशी, असा सवाल खासदार राजू शेट्टी यांनी उपस्थित केलाय.