'भाजपच्या दबावाला जेव्हा...', तेजस्वी यादव यांचं कौतूक करत रोहित पवार यांची मोठी भविष्यवाणी!

Rohit Pawar On Tejashwi Yadav :  बिहारमधील राजकीय गोंधळाचा (Bihar Politics) परिणाम संपूर्ण देशभर होताना दिसत आहे. अशातच आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मोठं वक्तव्य करत भाजपला पुन्हा धारेवर धरलंय.

सौरभ तळेकर | Updated: Jan 28, 2024, 08:09 PM IST
'भाजपच्या दबावाला जेव्हा...', तेजस्वी यादव यांचं कौतूक करत रोहित पवार यांची मोठी भविष्यवाणी! title=
Rohit Pawar prediction over Tejashwi Yadav

Bihar Politics : बिहारच्या राजकारणाचे भीष्म पितामह म्हटले जाणारे नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी रविवारी संध्याकाळी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तब्बल नवव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांनी मिळवलाय. नितीश कुमार यांनी पुन्हा कूस बदलली अन् बिहारमध्ये सत्तांतर झाल्याचं पहायला मिळालंय. नितीश कुमार यांच्या निर्णयामुळे तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांना मोठा धक्का बसलाय. बिहारमधील राजकीय गोंधळाचा परिणाम संपूर्ण देशभर होताना दिसत आहे. अशातच आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मोठं वक्तव्य करत भाजपला पुन्हा धारेवर धरलंय.

काय म्हणाले रोहित पवार?

आपल्याला अडचण ठरू पाहणाऱ्या प्रादेशिक पक्षांना कमकुवत करण्यासाठी सरकारे पाडणे, केंद्रीय यंत्रणा अथवा इतर मार्गाचा अवलंब भाजपकडून केला जातोय, परंतु ज्यांचा वैचारिक पाया भक्कम आहे, त्यांनी लोकशाही मूल्यांच्या रक्षणार्थ कुठल्याही दबावाला बळी न पडता भाजपसोबत संघर्ष करण्याची भूमिका घेतली आहे, असं रोहित पवार यांनी पोस्ट करत म्हटलं आहे.

आज बिहारमध्ये तेजस्वी यादव यांनी घेतलेली भूमिका कौतुकास्पद असून बिहारची स्वाभिमानी जनता तेजस्वी यांच्यासोबत भक्कमपणे उभी राहील आणि तेजस्वी उद्या नक्कीच बिहारचा भरोसादायक चेहरा म्हणून पुढे येतील, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. 

तेजस्वी यादव यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दल बिहार विधानसभेत सर्वात मोठा पक्ष आहे. 243 जागांच्या बिहार विधानसभेत राष्ट्रीय जनता दलाचे 79 आमदार आहेत. त्यांना काँग्रेसचे 19 आमदार आणि 16 कम्युनिस्ट पक्षांचाही पाठिंबा आहे. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव 2022 मध्ये एकत्र आले होते. तब्बल 17 महिने त्यांचं राजकीय समीकरण टिकलं.

दरम्यान, वेगवेगळ्या दबाव तंत्राचा वापर करून, व्यापाऱ्यांना धमकावून मुंबईतल्या हिरे व्यापाऱ्यांना सुरतमध्ये स्थलांतर करण्यास भाग पाडलं पण शेवटी पदरात काय पडलं? मुंबई हे नैसर्गिक व्यापार केंद्र आहे. जागतिक व्यापाराला पूरक असं वातावरण मुंबईत आहे, त्यामुळे केवळ मोठमोठ्या बिल्डींग उभारून मुंबईचा व्यापार स्थलांतरीत करण्याचे मनसुबे देशाच्या हिताचे नाहीत. हे असले मनसुबे रचणाऱ्यांनी आणि त्यांना साथ देण्यासाठी मूग गिळून गप्प बसणाऱ्या महाराष्ट्र धर्म विरोधी गद्दारांनी लक्षात घ्यायला हवं, असं म्हणत रोहित पवारांनी हल्लाबोल केला आहे.