धक्कादायक! प्रवाशांच्या जीवाशी खेळ; रेल्वेतील अंडा बिर्याणीमधून विषबाधा, 90 जण रुग्णालयात दाखल

Railway News Marathi: रेल्वेच्या जन आहार स्टॉलवरुन मागविण्यात आलेल्या अंडा बिर्याणीमुळे जवळपास 90 प्रवाशांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. या प्रवाशांना उपचारासाठी विविध शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

श्वेता चव्हाण | Updated: Apr 29, 2024, 09:35 AM IST
धक्कादायक! प्रवाशांच्या जीवाशी खेळ; रेल्वेतील अंडा बिर्याणीमधून विषबाधा, 90 जण रुग्णालयात दाखल title=

Passengers poisoned by egg biryani In Mararhi: सुट्ट्यांच्या कालावधीत गावाला जाण्याचे बेत आखले जाते. या काळात अनेकजण लांबपल्लाच्या प्रवासासाठी रेल्वेला पसंती देतात. तसेच रेल्वेत अनेकप्रकारची सोय सुविधा उपलब्ध असल्यामुळे प्रवाशांना रेल्वेने प्रवास करणं सोयीस्कर वाटते. मात्र याच लांबपल्ल्याच्या प्रवासादरम्यान एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. रेल्वेच्या जनआहार स्टॉलवरून मागविण्यात आलेल्या अंडा बिर्याणीतून जवळपास 90 प्रवाशांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रवाशांना इटारसी, कानपूर, झाशी अशा जवळपास सर्वच ठिकाणी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, यशवंतपूर एक्स्प्रेस ही शुक्रवारी (26 एप्रिल)  सकाळी गोरखपूरकडे जात असताना बल्लारशाह रेल्वे स्थानकावरुन जन आहार स्टॉलमधून अंडा बिर्याणीचे 200 पार्सल मागविण्यात आले. नागपूर रेल्वे स्थानकावरच्या स्टॉल वर त्यातील काही पार्सल उतरविण्यात आले होते.  मागणीनुसार बल्लारशाह, नागपूर, इटारसी आणि पुढे वेगवेगळ्या प्रवाशांना अंडा बिर्याणी देण्यात आली. प्रवाशांनी ही अंडा बिर्याणी खाल्ल्यांनंतर तीन ते चार तासांनी गाडी इटारसीजवळ असताना प्रवाशांना अस्वस्थ वाटू लागले. तसेच मळमळ, उलट्या, पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. 

हा प्रकार वेगवेगळ्या कोचमध्ये घडून येत होते. सुरुवातीला या प्रकरणाची माहिती फार कोणाला माहित नसल्याने गांभार्याने कुणी घेत नव्हते. पण अनेक डब्यांतील प्रवाशांमध्ये अशीच लक्षणे दिसून आल्याचे कळताच खळबळ उडाली. 

रेल्वे प्रशासनाने ही माहिती कळताच कानपूर रेल्वे स्थानकावरील डॉक्टरांचे पथक ट्रेनमध्ये चढले आणि प्रवाशांवर उपचार सुरू झाले. काही प्रवाशांमध्ये अन्नातून विषबाधा झाल्याची गंभीर लक्षणे दिसू लागली आणि त्यांना विविध रेल्वे स्थानकांवर रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, अंडा बिर्याणी खाल्ल्यानंतर प्रवाशांना विषबाधा होत असल्याचे निदर्शनास आल्याने मध्य रेल्वेच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंधित अधिकाऱ्यांनी संपर्क साधला.

दरम्यान नागपूरच्या अधिकाऱ्यांना ही माहिती मिळताच त्यांनी अंडा बिर्याणीचे पार्सल कुठून आले आणि प्रवाशांना कुठून देणे सुरु झाले त्याची चौकशी सुरु केली. त्यानंतर 100 ते 200 अंडा बिर्याणी पार्सला पुरवठा बल्लारशाह रेल्वे स्टेशनवरुव झाल्याचे आणि नागपूर रेल्वे स्टेशनवरुन जनआहार स्टॉलवरून रेल्वे ट्रेनमध्ये अनेक पाकिटे भरण्यात आली होती. त्यामुळे मध्य रेल्वेचे विभागीय प्रशासक मनीष अग्रवाल, वरिष्ठ व्यावसायिक प्रशासक अमन मित्तल यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधित पार्सल विकणाऱ्या येथील जन आहारचा स्टॉल सिल केला. 

खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीला, सॅम्पल जप्त

या घटनेची मध्य रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेत नागपूर व बल्लारशाह केंद्रांवर विविध खाद्यपदार्थांचे नमुने जप्त केले. ते चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून त्याचा अहवाल मंगळवारपर्यंत प्राप्त होईल. त्यानंतर कारवाईचे स्वरूप ठरवले जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.