'चिंतामणराव वनगा परिवाराची शिवसेनेत येण्याची इच्छा होती' -उद्धव ठाकरे

 चिंतामणराव वनगा यांचं परिवार शिवसेनेत सामिल झालं, यावर उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की

Updated: May 6, 2018, 02:11 PM IST
'चिंतामणराव वनगा परिवाराची शिवसेनेत येण्याची इच्छा होती' -उद्धव ठाकरे title=

नाशिक : शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्दव ठाकरे आज नाशिकमध्ये आहेत, भाजपाचे दिवंगत माजी खासदार चिंतामणराव वनगा यांचं परिवार शिवसेनेत सामिल झालं, वनगा परिवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्रीवर नेमकी काय चर्चा झाली, यावर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं, 'भाजपाचे माजी खासदार चिंतामणराव वनगा यांनी पालघर सारख्या भागात आपलं संपूर्ण आयुष्य हे, हिंदूत्व, संघ आणि भाजपासाठी वेचलं. चिंतामणराव वनगा यांचं कुटूंब मातोश्रीवर आलं, त्यांनी आम्हाला शिवसेनेत घ्या, असं सांगितलं, पण आम्ही त्यांना सांगितलं की, तुम्ही पुन्हा एकदा यावर विचार करा, आहात तेथूनच तुम्हाला काय करता येईल ते पाहा, पण त्यांनी सांगितलं की, आम्हाला याचा पुन्हा अनुभव घ्यायचा नाहीय, आम्हाला शिवसेनेत यायचंय, यानंतर आम्ही त्यांना शिवसेनेत दाखल करून घेतलं, असं उद्धव ठाकरे यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत रविवारी बोलताना सांगितलं.

मातोश्रीवर पोहोचलेल्या भाजपाचे माजी खासदार चिंतामणराव वनगा यांच्या परिवाराच्या डोळ्यातील अश्रू, टेलिव्हिजनवर झळकल्यानंतर हा विषय राज्यात चर्चेत आला होता.

पालघरमध्ये चिंतामण वनगा यांना मानणारी मंडळी

पालघरचे माजी खासदार चिंतामणराव वनगा यांचं संपूर्ण परिवार काही दिवसांपूर्वी शिवसेनेत दाखल झालं. चिंतामणराव वनगा यांनी पालघरमध्ये भाजपासाठी मोठं काम केलं आहे, पालघरमध्ये भाजपा मजबूत करण्यासाठी चिंतामण वनगा यांचा मोठा सहभाग आहे, चिंतामण वनगा यांना मानणारी मंडळी तेथे आहे, अशात चिंतामणराव वनगा कुटुंबियांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने चर्चेला उधाण आलं आहे. कारण आता पालघर लोकसभा पोटनिवडणूक लागली आणि त्यासाठी आपल्याकडे पक्षाने म्हणजेच भाजपाने दुर्लक्ष केल्याचा आरोप चिंतामणराव वनगा यांच्या परिवाराने केला आहे. 

वनगा यांच्याच परिवारातील व्यक्तीचा विचार होत होता?

तर दुसरीकडे, या जागेसाठी चिंतामणराव वनगा यांच्या परिवारातील व्यक्तीचाच विचार होत होता, पण ते मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत दाखल झाले, हे टेलिव्हिजनवर दिसलं, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

चिंतामणराव वनगांचं परिवार मातोश्रीवर आणि शिवसेनेत दाखल झाल्याचं माहित झाल्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी आदिवासी मंत्री विष्णु सावरा यांना बोलावून घेतले, त्यावरून आणखी चर्चेला उधाण आलं की, विष्णु सावरा हे पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार तर नसतील ना? अशी चर्चा आहे.