१०वी-१२वीमध्ये नापासऐवजी 'कौशल्य विकासास पात्र' शेरा

१०वी आणि १२वी च्या विद्यार्थ्यांसाठी सरकारचा निर्णय

Updated: Dec 5, 2019, 10:19 AM IST
१०वी-१२वीमध्ये नापासऐवजी 'कौशल्य विकासास पात्र' शेरा title=

पुणे : १० वी आणि १२वी बोर्डच्या परिक्षेत ३ किंवा अधिक विषयात नापास झाल्यास नापासऐवजी "कौशल्य विकासास पात्र"  असा शेरा मार्कशीटवर देण्यात येणार आहे. आतापर्यंत २ विषयांत नापास असेल तर एटीकेटीसाठी पात्र आणि ३ किंवा त्यापेक्षा जास्त विषयात नापास असेल तर त्याला जुलै १९ च्या परीक्षेत देखील नापास हा शेरा होता.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या गुणपत्रिकेवर नापास हा शेरा हटवून त्याऐवजी कौशल्य विकासास पात्र असा शेरा यापुढे देण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाने जारी केला आहे.

दहावी, बारावी परीक्षेत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण व्हावा आणि त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावं, यासाठी अशा विद्यार्थ्यांना रोजगारक्षम कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याचा निर्णय कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाने घेतला आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना रोजगारक्षम करण्यासाठी कौशल्य सेतू कार्यक्रम योजना राबविण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.