राजकारण्यांचा इतर क्षेत्रात हस्तक्षेप नको, साहित्य संमेलनात गडकरींचं भाष्य

आपल्या बेधडक बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी, सरकारलाच घरचा आहेर दिला.

Updated: Jan 13, 2019, 07:19 PM IST
राजकारण्यांचा इतर क्षेत्रात हस्तक्षेप नको, साहित्य संमेलनात गडकरींचं भाष्य title=

यवतमाळ : आपल्या बेधडक बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी, सरकारलाच घरचा आहेर दिला. साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात राजकारण्यांनी हस्तक्षेप करु नये, मात्र संवाद असावा असं आवाहन त्यांनी या निमित्तानं केलं. यवतमाळमध्ये आयोजित ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या भाषणात ते बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द करण्याच्या वादाच्या पार्श्वभूमीवर, मतभेद असावेत मात्र मनभेद असू नयेत याचीही त्यांनी जाणीव करुन दिली. विचारभिन्नता चालेल मात्र विचारशून्यता धोक्याची असल्याकडेही गडकरींनी लक्ष वेधलं.

वैशाली येडेंच्या हस्ते उद्घाटन करणं हा उत्तम निर्णय असल्याचं गडकरी म्हणाले. तसंच साहित्यिकांचे विचार ही आपली ताकद असल्याची प्रतिक्रिया नितीन गडकरी यांनी दिली. महाराष्ट्रात साहित्य चळवळीचं योगदान मोठं आहे. संमेलन सगळ्यांच्या सहभागामुळे यशस्वी झालं, असं मत गडकरींनी मांडलं. तसंच भारतीय संस्कृती मूल्याधिष्ठित आहे. विविधतेत एकता ही देशाची विशेषता आहे. विश्वगुरू बनण्याची भारतीयांमध्ये क्षमता असल्याचा विश्वास नितीन गडकरींनी व्यक्त केला. सिंचनासाठी १ लाख कोटी रुपये आणले असल्याचंही गडकरी म्हणाले. 

पाहा नितीन गडकरींचं संपूर्ण भाषण