Nashik Crime News : बहिणीला छेडल्याचा जाब विचारणाऱ्या भावावर टोळक्याकडून कोयत्यानं वार

Nashik Crime News : पुण्याच्या कोयता गँगची चर्चा सुरु असताना आणि काही हादरवणाऱ्या घटना घडत असताना आता नाशिकमधील एका घटनेनं अनेकांनाच धक्का बसला आहे.   

Updated: Feb 7, 2023, 09:59 AM IST
Nashik Crime News : बहिणीला छेडल्याचा जाब विचारणाऱ्या भावावर टोळक्याकडून कोयत्यानं वार title=
Nashik Crime News a group attacked brother sister with koyta after eve teasing the girl latest Marathi news

सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक; बहिणीला छेडल्यामुळं याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या भावावर आणि त्याच्या बहिणीवर टोळक्याने कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना नाशिकमधील सिडको भागातील बुरकुले हॉल परिसरात घडली. रविवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली, ज्यामध्ये दोघंही बहीण- भाऊ जखमी झाले. भाऊ उमेश भुजबळ याला या हल्ल्यात हातवर, कमरेवर आणि डोक्यावर मार लागला आहे. तर, बहीण प्रीती हिच्या हातावर कोयत्याचा वार लागला आहे. (Nashik News)

हल्ल्यानंतर जखमी उमेश भुजबळ आणि त्याच्या बहिणीला जिल्हा शासकीय रुग्णायलाय नेत त्यांच्यावर तातडीनं उपचार सुरू करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच टोळक्यावर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

नेमकं काय घडलं होतं.... ? 

प्रीती क्लासवरून घरी परतत असताना काही मुलं सिडको परिसरातील बुरकुले हॉलच्या भागात बसली होती. यावेळी प्रीतीला पाहून त्यांनी अश्लील हावभाव केले, तिला चिडवलंही. घडला संपूर्ण प्रकार तिनं तिच्या भावाला सांगितला. भाऊ जेव्हा बहिणीसोबत घडल्या प्रकरणाचा जाब विचारायला गेला तेव्हा तिथं बसलेल्या तावळखोरांनी आपल्याजवळ असलेला कोयता बाहेर काढला आणि त्याला मारायला सुरुवात केली. 

हेसुद्धा वाचा : Shaktipeeth Mahamarg : 'समृद्धी' नंतर आता मिशन 'शक्तिपीठ'! कसा असणार हा ग्रीन फिल्ड सुपरफास्ट हायवे?

भावाला होणारी मारहाण पाहून या तरुणीनं टोळक्याला थांबवण्याचाही प्रयत्न केला. पण, त्यावेळी या टवाळखोरांनी तिच्यावरदेखील कोयत्यानं हल्ला चढवला. ज्यामध्ये तीसुद्धा जखमी झाली.  घटना इतकी गंभीर होती, की यातून ती अद्यापही सावरलेली नाही. 

नातेवाईकांचा संताप 

नातेवाईकांपर्यंत ही माहिती पोहोचताच त्यांच्याकडून आता या टोळक्यावर लवकरात लवकर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांत्याकडून आणि हल्ल्यात जखमी झालेल्या भाऊ- बहिणीकडून करण्यात येत आहे. सदरील घटना पाहता सध्याच्या घडीला गुंडगिरी आणि हुल्लडबाजांना कुठंतरी धडा शिकवला पाहिजे असाच सूर नागरिकांमधून आळवला जात असल्याचं स्पष्ट होत आहे. इतकंच नव्हे तर, पोलिसांचा धाक गुंडांना राहिला आहे की नाही..? हा प्रश्नही संतप्त नागरिकांनी विचारण्यास सुरुवात केली आहे.