राज्य सरकारच्या पत्राला रेल्वेकडून उत्तर, सर्वांसाठी लोकल सुरु होणार ?

 राज्य सरकार आणि रेल्वे यांची लवकर बैठक व्हावी

Updated: Oct 29, 2020, 01:35 PM IST
राज्य सरकारच्या पत्राला रेल्वेकडून उत्तर, सर्वांसाठी लोकल सुरु होणार ? title=

मुंबई : सरसकट लोकल सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकारने पश्चिम रेल्वे,मध्य रेल्वेला पत्र पाठविले होते. या पत्राला रेल्वेकडून उत्तर आले आहे. २२ आणि २७ ऑक्टोंबरला राज्य सरकारसोबत झालेल्या बैठकीचा संदर्भ देऊन, रेल्वेने कार्यालयीन वेळा बदलण्या संदर्भात या पत्रात उल्लेख केला आहे.ज्यामुळे गर्दीच्या वेळी अडचण होणार नसल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे. लोकल सुरू झाल्यावर गर्दीचे नियोजन कसे करणार ?  अशी विचारणा या पत्राद्वारे रेल्वेने राज्य सरकारला केले आहे. शिवाय लोकल सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकार आणि रेल्वे यांची लवकर बैठक व्हावी. यामध्ये गर्दी नियोजन संदर्भात तांत्रिक दृष्ट्या मार्ग काढावा असे यात म्हटले आहे. 

राज्य सरकारने पाठवलेल्या पत्रात प्रत्येक तासाला महिला स्पेशल गाडी चालवावी असे म्हटले आहे. पण ते तूर्तास शक्य नाही असे रेल्वेने आपल्या पत्रात म्हटलंय. 

कोरोना व्हायरच्या पार्वभूमीवर जवळपास सात महिन्यांहून अधिक काळासाठी ठप्प असणाऱी लोकल सेवा अत्य़ावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी टप्प्याटप्प्यानं सुरु करण्यात आली. पण सर्वसामान्य नागरिकांसाठी मात्र अद्यापही ही रेल्वे सेवा सुरु करण्यास विलंब होत आहे. पण, आता मात्र त्यासाठी वेगानं हालचाली होत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

सध्याच्या घडीला एकंदर परिस्थिती पाहता, राज्य सरकारने रेल्वेला सर्वसामान्य लोकांसाठी लोकल सेवा सुरू करण्याची विनंती केली आहे. या विनंती मध्ये कोणी कधी प्रवास करावा याबाबत सूचना केल्या गेल्या आहेत. आता रेल्वेकडून येणाऱ्या निर्णयाची शासनासोबतच नागरिकांनाही प्रतीक्षा लागली आहे. 

दरम्यान, मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वेला राज्य सरकारचं पत्र प्राप्त झालं असून याचा सकारात्मक पध्दतीनं अभ्यास करून पुढे यावर कशा पध्दतीनं कार्यवाही करता याचा आढावा घेतला जात आहे. .

रेल्वेला उद्देशून करण्यात आलेल्या या पत्रातून गर्दी टाळण्यासाठी अत्यावश्यक सेवेशी संबंधित लोकं आणि सर्वसामान्य लोकांच्या प्रवासाच्या वेळा वेगळ्या ठेवण्याची सूचना राज्य सरकारक़डून करण्यात आली आहे. 

पत्रातील सुचनांमध्ये नेमकं काय...

- सकाळी ७.३० पर्यंत सर्वांसाठी लोकल सुरु करा 
- दुपारी ११ ते ४.३०, रात्री ८ नंतर लोकलप्रवास 
- अत्यावश्यक सेवांमधील प्रवाशांसाठी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत प्रवास 
- तिकीट असलेल्या सर्वांना सकाळी ११ ते दुपारी ४.३० पर्यंत प्रवासाची मुभा. 
- दर तासाला एक लेडीज स्पेशल लोकल