अलिबागकरांना सर्वात जास्त खिजवणाऱ्या वाक्यप्रचारावर मुंबई हायकोर्टाने काय म्हटलं होतं?

इंडियन आयडलचा सूत्रसंचालक आदित्य नारायणने कार्यक्रमादरम्यान अलिबागबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.  

Updated: May 25, 2021, 05:59 PM IST
अलिबागकरांना सर्वात जास्त खिजवणाऱ्या वाक्यप्रचारावर मुंबई हायकोर्टाने काय म्हटलं होतं? title=

मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक म्हणजे म्हणजे (India Idol) इंडियन आयडल. हा कार्यक्रम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आणि प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायणने (aditya narayan controvercial statment on alibaug) वादग्रस्त वक्तव्य केलं. आदित्यने अलिबाग शहराबद्दल कार्यक्रमादरम्यान वादग्रस्त विधान केलं. यामुळे तो वादात सापडला. आदित्यने ‘इंडियन आयडलच्या 12 व्या पर्वातील एपिसोडमध्ये स्पर्धकाशी बोलताना हे वादग्रस्त वक्तव्य केलं. "राग पट्टी ठीकसे दिया करो, हम अलिबागसे आये है क्या" असं आदित्य म्हणाला. यावरुन अलिबागकर संतप्त झाले आहेत. यावरुन विविध प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. दरम्यान 2019 मध्ये "अलीबाग से आया है क्या?" या वाक्यप्रचारावरुन राजेंद्र ठाकूर यांनी याचिका दाखल केली होती. यावर उच्च न्यायलयाने काय निर्णय दिला होता, हे आपण यानिमित्ताने जाणून घेणार आहोत. (Mumbai High Court had rejected Rajendra Thakur's plea in 2019 on Alibag Defamation)

उच्च न्यायलयाने काय म्हटलं होतं?

"प्रत्येक समाजावर विनोद केले जातात. संता-बंता आणि उत्तर भारतीयांवरही विनोद केले जातात. त्यामुळे तुम्ही हे विनोद म्हणून घ्या. त्या विनोदामुळे तुम्ही स्वत:ला अपमानित वाटून घेऊ नका. या विधानात आम्हाला काहीच आपत्तीजनक वाटत नाही", असं म्हणत मुख्य न्यायाधीश प्रदीप नंदराजोग आणि न्यायाधीश एन एम जामदार यांच्या खंडपीठाने राजेंद्र ठाकूर यांची याचिका फेटाळली होती.

ठाकूर यांनी या याचिकेत "अलीबाग से आया है क्या?" हे वाक्यप्रचार अपमानजनक आणि चूकीचं असल्याचं म्हटलं होतं. तसेच या वाक्यप्रचारावरुन अलिबागकरांना निरक्षर दाखवण्याचा हेतू असल्याचंही त्यांनी नमूद केलं होतं. राजेंद्र ठाकूर यांनी उच्च न्यायालयात अॅड. रघुराज देशपांडे यांच्याद्वारे याचिका दाखल केली होती.  

राजेंद्र ठाकूर कोण आहेत?

राजेंद्र ठाकूर हे रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यामधील सातीर्जे गावातील रहिवाशी आहेत. ते काँग्रेसचे माजी आमदार राहिलेले मधुकर ठाकूर यांचे पूत्र आहेत.