'मुंबई महाराष्ट्राचीच, कुणाच्या बापाची नाही' देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावलं

सीमाप्रश्नी कर्नाटकविरोधात ठराव एकमतान मंजूर करण्यात आल्यानंतर कर्नाटकच्या मंत्र्यांची मुक्ताफळं, कर्नाटकच्या बोलघेवड्या नेत्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं  

Updated: Dec 28, 2022, 07:16 PM IST
'मुंबई महाराष्ट्राचीच, कुणाच्या बापाची नाही' देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावलं  title=

Maharashtra Politics : विधिमंडळात सीमाप्रश्नावर (Border Issue) देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadanvis) आक्रमक आणि रोखठोक बाणा दिसून आला. देवेंद्र फडणवीसांनी कर्नाटक सीमावादावरुन (Maharashtra Karnataka Border Dispute) कर्नाटकच्या बोलघेवड्या नेत्यांना ठणकावलंच. पण त्याचवेळी मुंबई (Mumbai) महाराष्ट्राचीच आहे, कुणाच्या बापाची नाही असंही सांगायला फडणवीस विसरले नाहीत. 

बेळगाव कारवार बिदर भालकीसह 865 मराठीभाषक गावांची इंच अन् इंच जमीन महाराष्ट्रात सामील करण्यासाठी विधिमंडळात एकमतानं ठराव करण्यात आला. महाराष्ट्रानं केलेल्या या ठरावानंतर कर्नाटकचे नेते बिथरले. कर्नाटकचे उच्च शिक्षण मंत्री सी.एन.अश्वत्थ यांनी तर टोक गाठलं. कोणता प्रदेश केंद्रशासित करायचा असेल तर आधी मुंबईचा विचार करावा लागेल अशी मुक्ताफळं सीएन अश्वत्थ यांनी उधळली.

त्यांच्या विधानावरुन विरोधक आक्रमक झाले आणि मग देवेंद्र फडणवीसांनी कर्नाटकला आपल्या खास शैलीत सुनावलं. फक्त सीमावादावरुन फडणवीसांनी उत्तर दिलं नाही तर मुंबई कुणाच्या बापाची नाही, मुंबई महाराष्ट्राचीच आहे असंही फडणवीसांनी ठणकावलं. एकीकडे फडणवीस आक्रमक होत असतानाच विरोधकांनीही कर्नाटकला शेलक्या शब्दात फटकारलं.

भाजपला मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची अशी टीका अनेक वर्षांपासून आपण ऐकतोय. पण फडणवीसांनी सीमावादावर कर्नाटकला सुनावताना मुंबई महाराष्ट्राचीच आहे असं ठणकावून सांगितलं. संदर्भ कर्नाटकचा असला तरी फडणवीसांनी मारलेला बाण जिथे लागायचा होता तिथे लागला याची खमंग चर्चा नागपुरात सुरु आहे. 

ठराव एकमताने मंजूर
सीमाप्रश्नी कर्नाटकविरोधात ठराव एकमतान मंजूर करण्यात आला. बेळगाव, कारवार, बिदर, भालकीसह 865 गावं महाराष्ट्रात आणण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. तसा उल्लेख या ठरावात करण्यात आला आहे. (Maharashtra Political News) अनेक दिवसांपासून हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा (Maharashtra Karnataka Border ) मुद्दा गाजत होता. कर्नाटक सरकारने महाराष्ट्रविरोधी ठराव केल्यानंतर हा वाद अधिक चिघळला. विरोधकांनी या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांची कोंडी केली होती. वादग्रस्त सीमाभाग महाराष्ट्रात आणण्यात एकमत झाले. विधानसभेत सर्वानुमते हा ठराव मंजूर करण्यात आला.